पिंपरी चिंचवड:-पिंपरी-चिंचवडकरांना दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी आणखीन 30 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत 30 एमएलडी पाणी उपलब्ध होत नाही. तोपर्यंत पाणीपुरवठा एक दिवसाआडच सुरू राहणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करत अनधिकृत नळजोडांवर कारवाईची मोहीम हाती घेणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (मंगळवारी) सांगितले.

पिंपरी-चिंचवडकरांना दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी आणखीन 30 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. जादा लागणारे 30 एमएलडी पाणी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे मागील दहा महिन्यापासून शहरवासीयांना एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.

याबाबत बोलताना आयुक्त हर्डीकर म्हणाले, 30 एमएलडी जादा पाणी उपलब्ध झाले नाही. जोपर्यंत पाणी उपलब्ध होत नाही. तोपर्यंत पाणीपुरवठा दिवसाआडच सुरू राहणार आहे. पाणी अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यासाठी रावेत येथील पाणी उचलण्याची क्षमता वाढविली जाणार आहे.
महापालिका परिसरात अनधिकृतपणे पाणी चोरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच अनधिकृत नळजोड तोडण्याची मोहीम राबविली जाणार असून पाणीपुरवठा विभागास याबाबत सूचना केल्या आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठा कमी आहे.

भामा आसखेड आणि आंद्रा धरणातून पाणी आणण्याचे नियोजन सुरू आहे. महापालिकेच्या सेक्टर 23 मधील जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता 100 एमएलडीने वाढविण्यासाठीचे काम सुरू आहे. त्यामुळे अधिकचे पाणी उपलब्ध होईल. अमृत योजनेच्या 24 तास पाणी पुरवठा योजनेचे 80 टक्के काम पूर्ण झाले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

नवीन मिळकतीचा शोध घेणार !

महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी कर संकलनावर भर दिला जाणार आहे. तसेच नवीन मिळकतीचा शोध घेतला जाणार आहे. वाढीव बांधकामे आणि पत्राशेडची नोंद करून उत्पन्न वाढविले जाणार आहे. अनधिकृत बांधकामांना नोटिसा दिल्या असून कारवाई सुरू होणार असल्याचे हर्डीकर यांनी सांगितले.