जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
राजशिष्टाचाराच्या चर्चेनिमित्त एक प्रश्न उपस्थित केल्या जातो.
तो म्हणजे, राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय अतिथी राज्यात / शहरात येतात, त्यावेळी त्यांच्या स्वागताच्या वेळी ठराविक रंगांची फुलं असलेला पुष्पगुच्छ द्यावा लागतो का ?
तर याचे स्पष्ट उत्तर 'नाही' असे आहे !
प्रोटोकॉल मॅन्युअल मध्ये किंवा शासनाने वेळोवेळी केलेल्या राजशिष्टाचार संबंधी सूचनांमध्ये कोठेही अमुकच रंगाच्या फुलांनी मान्यवरांचे स्वागत करावे, असे सांगितलेले नाही.
परंतु, अलिखित परंपरेनुसार सहसा स्वागताला गडद, आणि सुंदर दिसतात म्हणून गुलाबाची फुले असलेला पुष्पगुच्छ दिल्या जातो.
निरोप देताना 'बदल' म्हणून इतर रंगांच्या फुलांचा पुष्पगुच्छ दिल्या जातो. बरेचदा निरोप देताना बुके देत देखील नाहीत.
*अलिखित परंपरा
राष्ट्रीय अतिथी (राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान) राज्यात सपत्नीक येतात त्यावेळी त्यांचे स्वागत करताना, मुख्य अतिथींना राज्यपालांकडून गुलाबी रंगाचा बुके देण्याची; तर त्यांच्या सोबत (असल्यास) त्यांच्या पत्नीला पिवळ्या रंगांच्या फुलांचा बुके देण्याची पद्धत महाराष्ट्र लोकभवनातर्फे अवलंबिली जाते, असे राजशिष्टाचारासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
*पुष्पगुच्छ नको, पुस्तक द्यावे*
सन २०१७ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणातून स्वागत प्रसंगी पुष्पगुच्छ न देता पुस्तक देण्याची प्रथा अवलंबण्याची सूचना केली होती.
त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने पंतप्रधानांचे स्वागत करताना त्यांना पुष्पगुच्छ न देता केवळ एक फुल द्यावे किंवा हातमागाचा खादीचा गमछा किंवा पुस्तक देण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या होत्या.
महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांचेकडे २०१७ साली काही महिने तामिळनाडूच्या राज्यपाल पदाचा कार्यभार देण्यात आला होता.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या अखेरच्या काळात ते चेन्नई येथे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आले होते. "आपण त्यावेळी पंतप्रधानांना निरोपाच्या वेळी विमानतळावर तिरुवल्लुवर यांच्या 'तिरुक्कुरल' या प्रसिद्ध ग्रंथाचे गुजराती भाषेत भाषांतरित केलेले पुस्तक भेट दिले होते," अशी आठवण विद्यासागर राव यांनी सांगितली.
*पुष्पगुच्छ न देता स्वागत*
दुखद प्रसंगी किंवा नैसर्गिक मानवनिर्मित संकट प्रसंगी राष्ट्रीय अतिथी राज्यात येतात त्यावेळी पुष्पगुच्छ न देता स्वागत केले जाते.
सन २००५ साली मुंबईत अतिवृष्टी झाली होती त्यावेळी तसेच जुलै २०११ साली मुंबईत लोकल ट्रेन मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह पाहणी दौऱ्यासाठी मुंबईला आले होते. त्यावेळी प्रथेप्रमाणे त्यांचे स्वागत करण्यास राज्यपाल, मुख्यमंत्री आदी उपस्थित होते. परंतु कुणीही त्यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले नव्हते.
*खर्च कपातीची पुष्पगुच्छ बंद करण्याची कोश्यारी यांची सूचना*
दिनांक २८ मे २०२० रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राजभवनाला खर्च कपातीचे निर्देश दिले होते.
त्यावेळी त्यांनी अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या स्वागताच्या वेळी पुष्पगुच्छ देण्याची प्रथा बंद करण्याची सूचना केली होती.
पुष्पगुच्छ कितीही सुंदर असला, फुले कितीही आकर्षक असली व कोणत्याही रंगांची असली, तरीही महनीय व्यक्तींना - त्यांच्या स्वागताला अनेकांची रांग लागली असल्याने - त्यांच्याकडे पाहता देखील येत नाही ! त्यामुळे बुकेंचा उपयोग केवळ फोटोपुरता उरतो. त्यामुळे पंतप्रधानांची सूचना महत्वाची ठरते.

