नाशिक प्रतिनिधी:-
नाशिक शहराला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित अशोक खरात प्रकरणाने आता अधिकच गंभीर वळण घेतले असून, तपासाचे धागेदोरे थेट राजकीय वर्तुळापर्यंत पोहोचत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शेकडो महिलांवरील कथित अत्याचार आणि गैरवर्तनाच्या आरोपांमुळे मुख्य आरोपी अशोक खरात सध्या पोलिस कोठडीत असून, तपास यंत्रणा अत्यंत बारकाईने पुरावे गोळा करत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील राजकीय नावे पुढे येऊ लागल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने या प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढला आहे. विरोधकांकडून त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत असताना, आता पोलीस प्रशासनानेही याबाबत सावध पण ठोस भूमिका घेतली आहे.
नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक महत्त्वाचे खुलासे केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, तपासादरम्यान पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव आलेला नाही. आरोपीला अटक करताना किंवा चौकशीदरम्यान कोणत्याही नेत्याचा हस्तक्षेप झालेला नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
तथापि, तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवीन आणि धक्कादायक पुरावे समोर येत आहेत. सुरुवातीच्या तक्रारीत कोणत्याही राजकीय व्यक्तीचा उल्लेख नव्हता, मात्र नंतरच्या तपासात काही संशयास्पद घडामोडी आणि संभाव्य लागेबांधे समोर आले आहेत. विशेषतः शिर्डी परिसरात कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, विविध शहरांतील संबंधित गुन्हे आता SIT (विशेष तपास पथक) कडे वर्ग करण्यात आले असून, तपास अधिक वेगाने आणि व्यापक स्वरूपात सुरू आहे. रुपाली चाकणकर यांच्या संभाव्य चौकशीबाबत विचारले असता, पोलीस आयुक्तांनी कोणतेही ठोस विधान टाळले असले तरी “पुरावे मिळाल्यास कुणालाही वाचवले जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा दिला आहे.
०००

