shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खरे तर महाभारताचे युध्दही टळू शकले असते..!!

महाभारताचं युद्ध अठरा दिवस चालले. या युध्दामध्ये कौरवांच्या बाजूने व पांडवांच्या बाजूने जेवढी मनुष्यहानी झाली, तेवढी कधीच झाली नव्हती. युद्ध संपल्यानंतर याचा द्रौपदीला खूप त्रास झाला. शरीराने व मनाने ती खूप खंगली होती. वयस्कर दिसायला लागली होती.     

हस्तिनापुरात सर्वदूर विधवाच विधवा दिसत होत्या. अनाथ मुले इकडे तिकडे फिरताना दिसत होती. एखाद दुसरा फक्त पुरुष दिसत होता. महाराणी द्रौपदी हस्तिनापुरातील महालात दु:खद अंत:करणात  निजली होती. तेव्हां श्रीकृष्ण तिच्या कक्षात आला. त्याला पाहून तिला राहावलं नाही. धावत जाऊन तिने त्याला मिठी मारली. ती त्याला म्हणाली, " भ्रातश्री, असा तर मी कधी विचारच नव्हता केला... हे असं कसं झालं?



कृष्ण म्हणाला, "पांचाली, नियती खूप निष्ठूर असते. ती आपल्या मनाप्रमाणे चालते. द्रौपदी, तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता नां? तू यशस्वी झालीस. फक्त दुर्योधन आणि  दुःशासनच नाही तर सर्वच कौरव संपले. द्रौपदी, तुला तर आनंदच व्हायला हवा होता."

द्रौपदी म्हणाली, "कृष्णा, तू मला सावरायला आला आहेस की हिणवायला आला आहेस ?" योगेश्वर कृष्ण म्हणतात, ''नाही द्रौपदी, मी तुला त्यातलं वास्तव सांगायला आलो आहे. आपल्या कर्माची फळे आपल्याला दिसत नाहीत. पण ती फळे समोर येतात तेव्हा आपण काहीच करू शकत नाही."



द्रौपदी  विचारते, "कृष्णा, मग ह्या युध्दाला मीच पूर्णपणे जबाबदार आहे. असं तुला म्हणायचं आहे कां?" कृष्ण म्हणतात, "नाही द्रौपदी, तू स्वत:ला इतकं महत्त्व देऊ नकोस. तू तुझ्या कर्मात थोडा जरी दूरदर्शीपणा दाखवला असतास तर तुला एवढा त्रास झाला नसता!" द्रौपदी विचारते, "कृष्णा, मी काय करू शकत होते?"

कृष्ण म्हणतो, "तुझ्या स्वयंवराच्या वेळी तू कर्णाचा अपमान करायला नको होतास. त्यानंतर कुंतीने तुला पाच पांडवांची पत्नी होण्याचा आदेश दिला त्याचा तू स्विकार केला नसतास, तर परिणाम काही वेगळे झाले असते. आणि त्यानंतर तू तुझ्या महालात दुर्योधनचा अपमान केला नसतास तर तुझं वस्रहरण झालं नसतं. कदाचित त्यावेळीही परिस्थिती वेगळी असती. आपले शब्दच आपल कर्म बनवतात. आपण आपला प्रत्येक शब्द विचार करुन बोलायला हवा. नाहीतर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वत:लाच नाही, तर आपल्या पूर्ण परिवाराला भोगावे लागतात.

जगात  फक्त मानव असा एक प्राणी आहे की त्याच्या दातात नाही तर जीभेत वीष आहे."
  (ही एक बोधकथा आहे.यातून आपण काय बोध घ्यायचा हे ज्याचे त्याने ठरवावे.)

म्हणून शब्द जपून वापरा.सध्या संपूर्ण देशात कोरोनाचे युद्ध चालू आहे. आपात्कालीन व्यवस्थापन चालू आहे.आपल्या लेखनीतून, वाणीतून, जीभेतून निघालेले शब्द आपल्याला संकटात टाकू शकतात. अनेक अडचणी निर्माण करू शकतात. अनेक वर्षांचे संबंध, नाते, मैत्री तोडू शकतात.

बोलताना विचार करा. समोरची व्यक्ती दुखावणार नाही याचाही विचार करा. दुसऱ्याला बोलताना आपण त्याच्या जागी असतो तर आपण काय केले असते याचाही विचार करा. कधी चुकून एखादा चुकीचा शब्द बाहेर पडलाच तर, तात्काळ त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून माफी मागा , समोरच्या व्यक्तीच्या मनातील राग,किल्मिषे दूर करा तरच मैत्री, नाते संबंध टिकू शकतात.

माहिती संकलन 
रमेश जेठे सर
close