क्वारंटाईन कालावधी कमी करण्याची तालुका शिवसेना प्रमुख राजा केणी यांची मागणी..!!
अलिबाग : (वार्ताहर) : ता.४ ऑगस्ट
गणेशोत्सवानिमित्ताने दुसऱ्या जिल्ह्यातून रायगडमध्ये येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वॉरंटाईनमध्ये राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिल्या आहेत. हा कालावधी कमी करण्यात यावा, अशी मागणी अलिबाग तालुका शिवसेना प्रमुख राजा केणी यांनी केली आहे.
29 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सावानिमित्ताने नियमावली प्रसिद्ध केली आहे. यामध्ये गणेश मूर्तींच्या उंचीबरोबरच, गणेशोत्सव मंडळाने कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, याबद्दल सूचना केल्या आहेत. यामध्ये गावाकडे येणाऱ्या गणेशभक्तांना 14 दिवसाचे क्वारंटाईन कालावधीची अट रायगड जिल्ह्यामध्ये गैरसोयीची असल्याचे अलिबाग तालुका शिवसेना प्रमुख राजा केणी यांचे म्हणणे आहे. आलेली संकटे दूर करण्याचे साकडे घालत गौरी-गणपती सण येथील नागरिक उत्साहात साजरा करतात. यासाठी वर्षातून एकदा गावाकडे येण्याचा प्रत्येक चाकरमानी प्रयत्न करीत असतो. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सद्या सर्वत्र नैराश्य पसरलेले असताना लाडक्या गणरायाचे मनोभावे पूजन करण्यासाठी अटींमध्ये शिथीलता द्यावी, अशी मागणी राजा केणी यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांच्याबरोबर अलिबाग तालुका संघटक सतिश पाटील ( बंड्या ), शहर प्रमुख संदिप पालकर, विभाग प्रमुख शंकर गुरव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

