shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नेहरूनगर, चिंचवडच्या जम्बो कोविड सेंटर्समध्ये अनेक त्रुटी; रुग्णांच्या जीविताशी खेळ?


पिंपरी :- कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी नेहरूनगर आणि चिंचवड येथे उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयांची उद्घाटने होऊन वीस दिवस झाले तरी अद्यापपर्यंत ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाहीत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून, ही रुग्णालये तातडीने उपलब्ध व्हावीत, अशी मागणी होऊ लागली आहे.
नेहरूनगर येथील कै.अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील शासनाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयाचे उद्घाटन २४ ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यापाठोपाठ चिंचवड ऑटो क्लस्टर येथील रुग्णालयाचे उद्घाटन २८ ऑगस्टला उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. भोसरी बालनगरी येथील जम्बो रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही तिन्ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नाहीत.

सद्यःस्थितीत शहरात रोज सरासरी एक हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तर, मृत्यूची संख्याही वाढत आहे. या स्थितीत तिन्ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणे, काळाची गरज आहे. या ठिकाणच्या त्रुटी दूर करून सुसज्ज वैद्यकीय यंत्रणा चालू व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधींनी वारंवार सूचना केल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर प्रयत्नही चालू आहेत. मात्र, तांत्रिक दोष, मनुष्यबळाच्या अडचणी यामुळे विलंब वाढत चालला आहे, याकडे लक्ष वेधले आहे.

अनेक त्रुटी असल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा गंभीर प्रकार म्हणावा लागेल, अशी टिका होऊ लागली आहे. वास्तविक, या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वतः लक्ष घालून त्रुटी दूर कराव्यात. दोष न ठेवता पारदर्शक पद्धतीने उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण करावीत, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.

रुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, आयसीयुमध्ये सर्व सोई-सुविधा युक्त जागा उपलब्ध ठेवणे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. खासगी रुग्णालयात कोविड रुग्ण दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जाते. अनेक ठिकाणी अवाजवी बिलांची आकारणी होते, अशा रुग्णालयांवर कडक निर्बंध लादायला हवेत. शासकीय पातळीवर राज्य सरकार, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, पीएमआरडीए यांच्यामध्ये योग्य समन्वय राहिला पाहिजे. अडचणी व समस्यांचे निवारण होण्यासाठी समन्वय समितीने सतर्क राहून नियंत्रण ठेवले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.
close