विविध पथकांच्या माध्यमातून घरोघरी तपासणी करण्यास झाली सुरुवात...!!
प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई :-आज १५ सप्टेंबर रोजी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिमेस आज सोनई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरुवात करण्यात आली.सोनई पंचायत समिती गणाचे सदस्य काकासाहेब डफाळ,सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ.राजेंद्र कसबे,पञकार संदिप दरंदले यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झाला. सोनई आरोग्य केंद्रा अंतर्गत प्रत्येक गावात आरोग्य पथक स्थापन करण्यात आले असुन या पथकामार्फत या घरोघरी सर्वेक्षण मोहिमेस सुरुवात झाली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजेंद्र कसबे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि कोरोनाला हरवण्यासाठी आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. आपापल्या भागातील जे नागरिक आजारी असतील किंवा त्यांना कोणती लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी आपल्या घरी येणारा आरोग्य पथकाला माहिती दिली पाहिजे.तसेच आपण मधुमेहा सह व इतर आजाराचा आपल्या कुटुंबाचा आरोग्य इतिहास सांगितला पाहिजे.तसेच कोरोनाची लक्षणे जाणवत असेल तर तसे सांगुन आपली कोरोना टेस्ट करून पाॅझिटिव असेल तर तात्काळ जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन उपचार घेतले पाहिजेत.कोणत्याही प्रकारचे आजार अंगावर काढू नका.ही संसर्गाची साखळी आपण सर्वांनी मिळून तोडली पाहिजे. त्यादृष्टीनेच प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. या भूमिकेतून ही मोहिम सुरु करण्यात आली आहे, असे प्रतिपादन यावेळी डाॅ.राजेंद्र कसबे यांनी केले.
या मोहिमेत सोनई आरोग्य केंद्राचे "कोरोनादूत" डाॅ.कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी सर्वेक्षण करुन प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक तपासणी करुन त्यांची माहिती संकलित करणार आहे. ही मोहिम दि.15 सप्टैबर ते 25 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार आहे. या मोहिमेत सर्व लोकप्रतिनिधी,ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, स्वयंसेवी संस्था,नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कोरोनादुत म्हणुण सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गृहभेटी, तपासणी आणि कोमॉर्बीड आजारी व्यक्तींना उपचार आणि आरोग्य शिक्षण याद्वारे या साथीवर नियंत्रण आणण्यासाठीची ही मोहिम म्हणजे आपला आरोग्य जागर आहे.
कुटुंबातील प्रत्येक सदस्याने स्वत:ची आणि त्याचबरोबर कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. घराबाहेर पडताना चेहर्यावर मास्क लावणे, सतत हात धुणे किंवा कोणत्याही बाह्य वस्तूला संपर्क झाला तर हात सॅनिटायझरने स्वच्छ करणे आवश्यक आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून कोरोनादूत ही माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहेत. आरोग्यविषयक जी खबरदारी बाळगण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ आणि कोरोना दूत देणार आहेत, त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
सोनई आरोग्य केंद्रा अंतर्गत प्रत्येक गावात घरोघरी जाऊन कोरोनादूत ही माहिती संकलित करणार आहेत. तसेच तपासणी करणार आहेत. त्यांना नागरिकांनी स्वताःहून सहकार्य केले पाहिजे. ही मोहिम सर्व नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आहे. कोणताही नागरिक केवळ दुर्लक्षामुळे उपचारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने घेतली पाहिजे. विशेषता ग्रामीण भागात नागरिकांनी मास्कशिवाय बाहेर पडणे थांबवले पाहिजे. स्वच्छताविषयक सवयींचा जागर आपण पुन्हा एकदा केला पाहिजे.असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना 'कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मी स्वत: माझ्या कुटुंबात, परिसरात लोकांना मास्क लावणे, आपापसात दोन मीटरचे अंतर ठेवणे, साबणाने वारंवार हात धुणे या सर्व गोष्टींसाठी प्रेरित करेन. कोरोनाच्या काळात कोणाशीही दुर्व्यवहार अथवा भेदभाव न करता सर्वांशी आपुलकीने आणि सद्भाभावाने वागेन. कोरोनाच्या लढाईत आपली ढाल म्हणून उभे असलेले डॉक्टर, नर्स, रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी, सर्व कार्यकर्ते यांचा मी सन्मान व समर्थन करेन व त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेन.' अशी प्रतिज्ञा देण्यात आली.
यावेळी सोनई आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य सेवक,सेविका,नर्स,आशा कर्मचारी इतर सर्व स्टाफ यावेळी हजर होता.

