जिच्यावर सामूहिक बलात्कार करून खून केला ती काय महिला नव्हती काय ?
राजकीय व सामाजिक क्षेत्रातील महिलांची दुटप्पी भूमिका नव्हे काय ?..!!
--
केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे :- केज तालुक्यातील साळेगाव येथे सकाळी ९:०० वा दरम्यान शेतात कापूस वेचणाऱ्या महिलेवर दोघा नराधमानी आळीपाळीने बलात्कार करून तिचा खून केला. तिची दोन्ही कोवळी मुले उघड्यावर पडली. मात्र एवढी गंभीर आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर घडली असताना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला मात्र मूग गिळून गप्प आहेत. एरवी देशात महिलांवर कुठेही अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्या की अत्यंत आक्रमकपणे शासन दरबारी घटनेचा निषेध व्यक्त करून गुन्हेगारांना कठोर शिक्षेची मागणी करणाऱ्या कुठे आहेत ? याची चर्चा सुरू आहे.
आरोपी
आरोपी
केज तालुक्यातील साळेगाव येथे अत्यंय निर्दयीपणे दोन नरधमानी शेतात कापूस वेचणाऱ्या विवाहित महिलेवर पाळत ठेवून तिच्या घरा शेजारी राहणाऱ्या एका नराधमाने बलात्कार केला. त्या नंतर त्याने त्याच्या मित्राला बोलावून त्यानेही तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. त्या नंतर दोघांनी मिळून तिचा गळा आवळून खून केला. तसेच ती मेली किंवा नाही म्हणून पुन्हा डोक्यात दगड घातला. सदर घटना ही मानवतेला काळिमा फासणारी व गंभीर आहे. तिची भैरव व सोहम ही दोन्ही अल्पवयीन मुले आईविना पोरकी झाली आहेत. ज्यांना आता आपली आई कुठे गेली! हे देखील सांगता येत नाही.
मात्र केज तालुक्यात केज पासून साळेगाव हे गाव हाकेच्या अंतरावर असताना आणि विविध महिला कार्यकर्त्या, सामाजिक चळवळीत कार्यरत असलेल्या व राजकीय क्षेत्रातील खासदार प्रितमताई मुंडे, आ. नमिताताई मुंदडा, सभापती परिमळा घुले यांनी अद्याप या घटने बाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एरवी मात्र दिल्ली ते गल्ली असे कुठेही महिला अत्याचाराच्या घटना घडल्या तर त्याचा तिव्र निषेध आणि गुन्हेगारांना कठोर शासन करण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन केली जातात. मग या प्रकरणावरून असे वाटते की, सदर मृत महिला ही महिला नव्हती की काय? तिची दोन्ही मुले पोरकी झाली याची कुणाला का दया येत नाही काय? तिच्यावर त्या दोन नरधमानी सामूहिक बलात्कार करून तिचा खून केला तरी याचा कुठे साधा निषेध व्यक्त होत नाही. म्हणजे सर्वांच्या संवेदना मेल्या आहेत की, काय?
दरम्यान या प्रकरणी अनेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही फक्त महिला बालहक्क अन्याय अत्याचार विरोधी समितीच्या सिताताई बनसोड आणि अँड रत्नजडिता मुंडे यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या.
" सदर घटना ही अत्यंत निंदनीय व घृणास्पद आहे. स्त्रीला एक उपभोग्य वस्तू म्हणून आजही पाहिले जाते आणि जर ती आपल्या वंश होत नसेल तर तिला जगण्याचा अधिकार हिरावून घेतला जातो हे या वरून अधोरेखित होते. "
----- सिताताई बनसोड,
सामाजिक कार्यकर्त्या
-----------------------------------------
" सामूहिक बलात्कार करून खून ही मनाला चटका लावणारी घटना आहे आणि यातील आरोपीना कठोर शासन व्हायला हवे हा खटला जलदगती न्यायालयात चालवून तिला न्याय मिळाला पाहिजे. "
--- अँड. रत्नजडिता मुंडे.

