पुणे:-कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदनेसाठी 1 जानेवारी रोजी लाखो नागरिक येत असतात. पण यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा भीमा कोरेगावसह अकरा गावामध्ये 30 डिसेंबर ते 2 जानेवारी पर्यंत नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे, तसा आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आज काढले आहे. भीमा कोरेगावमध्ये जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे.
भीमा कोरेगावच्या आसपास भागातील लोणीकंद, पेरणे, तुळापूर, बकोरी,वढू खुर्द, केसनंद, कोलवडी, डोंगरगाव, फुलगाव, सणसवाडी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या गावांमध्ये 30 डिसेंबर ते 2 जानेवारी सकाळी सहा वाजेपर्यंत बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी देशमुख यांनी आदेशात म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण 1 जानेवारीला दिवसभर दूरदर्शन आणि समाजमाध्यमांवर केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातूनच अभिवादन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

