गायके कुटुंबीयांचे मागील चार दिवसापासून पोलीस अधिक्षक कार्यालया समोर उपोषण सुरुच...
प्रतिनिधी मोहन शेगर, अहमदनगर
-पाथर्डीतील, ज्योती सर्जेराव गायके खून प्रकरणात पाथर्डी पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी रमेश काशीराम रत्नपारखी व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी केलेल्या तपासाबाबत समाधानी नसून, दीड वर्ष होऊन देखील आरोपी सापडत नसल्याने हा तपास सीआयडी कडे वर्ग करण्याच्या मागणीसाठी गायके कुटुंबीयांनी मागील दोन दिवसापासून पोलीस अधिक्षक कार्यालया समोर उपोषण सुरु केले आहे. यावेळी सर्जेराव गायके, गणपत गायके, सामाजिक कार्यकर्ते विश्वास वैरागर आदि कुटुंबीय सहभागी झाले आहेत.
गायके कुटुंबीयांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ज्योती गायके यांच्या खून प्रकरणावर पडदा टाकण्याच्या उद्देशाने आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांकडून आर्थिक तडजोड करून खुनाचा तपास करणेकामी दिरंगाई केली आहे. त्यामुळे मयत ज्योती हिचा खून करणारे मारेकरी कायद्याच्या कचाट्यातून मोकळे सुटले आहेत. अनेक वेळा पाथर्डी पोलीस स्टेशन तसेच अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात न्याय मिळावा या मागणीसाठी अधिकारी वर्गाला भेटून आरोपींना अटक करण्याची वारंवार मागणी केलेली आहे. तरीही पोलिस यंत्रणा कारवाई करीत नाही. त्यामुळे पाथर्डी पोलिसांच्या एकूण भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे.
तपासी अधिकारी यांच्या अकार्यक्षमतेमुळे आरोपी समाजात सर्रासपणे फिरत आहे. संशयित आरोपींनी पोलीसांशी आर्थिक तडजोड केली असल्याचा आरोप गायके कुटुंबीयांनी केला आहे. आरोपी हा विषय सोडून द्या, तडजोड करून हे प्रकरण मिटवून टाका, नाहीतर तुमची सुद्धा ज्योती सारखीच गत होईल अशा पध्दतीच्या धमक्या देत आहे.
सदर खुनाचा तपास जलदगतीने व्हावा म्हणून तपासी अधिकारी रत्नपारखी यांना भेटण्यास गेलो असता तेच कुटुंबीयांना धमकावून पोलीस स्टेशनला येऊ नका, या प्रकरणात मला फोन करू नका, आम्हाला एवढाच उद्योग नाही अशा प्रकारे बोलून आम्हास पोलीस स्टेशन बाहेर हाकलून देत असल्याचा अरोप देखील पिडीत कुटुंबीयांनी केला आहे.
अशा परिस्थितीमध्ये तपास अधिकारी रत्नपारखी हे ज्योती गायके खून प्रकरणातील आरोपींना अटक करुन न्याय देऊ शकत नाही. त्यांचा तपास हा अपयशी ठरला असून, हे प्रकरण दडपण्यासाठी दिरंगाई होत असल्याने सदर तपास पाथर्डी पोलिसांकडून तात्काळ काढून सीआयडी कडे देण्याची मागणी गायके कुटुंबीयांनी केली आहे.

