साईभक्तांच्या तक्रारी आल्यामुळे संस्थान प्रशासनाने सभ्य गणवेशा बाबत विनंती वजा आवाहन केले होते, सक्ती नाही -- साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे
सावळीविहीर (प्रतिनिधी) :
श्री साईबाबा समाधी मंदिरात जे भक्त सभ्य पोषाखात नसतात त्यांचेबाबत संस्थान प्रशासनाकडे काही भक्तांनी तक्रारी केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सभ्यतापूर्ण पोषाख अथवा भारतीय संस्कृतीस अनुसरुन पोषाख परिधान करुन मंदिरात दर्शनाकरीता यावे असे आवाहन वजा विनंती प्रशासनाकडून करण्यात आलेली होती. तसे फलकही मंदिर प्रवेशव्दारांवर लावण्यात आलेले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.
कान्हूराज बगाटे म्हणाले, श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी येणारे भक्त सभ्य पोषाखात नसतात अशा तक्रारी काही भक्तांनी संस्थान प्रशासनाकडे केलेल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन संस्थान प्रशासनाकडून सभ्यतापूर्ण पोषाख परिधान करुन मंदिरात दर्शनाकरीता यावे, असे आवाहन वजा विनंती करण्यात येऊन तसे फलक मंदिर प्रवेशव्दारांवर लावण्यात आलेले आहेत. आज गुरुवार निमित्त सुमारे ०९ हजार साईभक्तांनी श्रीं चे दर्शन घेतले असून यासर्व साईभक्तांची मंदिर प्रवेशव्दारांवर लावण्यात आलेले फलकाबाबत प्रतिक्रिया घेतली असता याबाबत एका ही भक्ताने कुठलाही आक्षेप घेतलेला नसून सदरचा निर्णय योग्यच आहे असा अभिप्राय ही नोंदविलेला आहे.
संस्थानच्या वतीने साईभक्तांना याबाबत कुठलीही सक्ती केली नसून हे फक्त आवाहन करण्यात आलेले आहे.
तसेच सध्या कोरोना विषाणु (कोवीड १९) ची साथ चालु असून राज्य शासनाच्या आदेशान्वये दिनांक १६ नोव्हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव लक्षात घेऊन साईभक्तांच्या आरोग्याच्या दृष्टीने दर्शनरांगेत सॅनिटायझेशन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे व दर्शनरांगेत प्रवेश करताना पाय धुण्याची व्यवस्था आदी उपाययोजना संस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत.
या व्यवस्थेबाबत साईभक्तांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच मंदिर खुले झाल्यापासून कर्मचा-यांच्या आरोग्याची काळजी संस्थानच्या वतीने घेण्यात येत असून आजतागायत संस्थानचे एक ही कर्मचारी कोरोना विषाणु बाधीत आढळून आलेला नाही. याबरोबरच दर्शनाकरीता आलेल्या साईभक्तांचे नाव व मोबाईल नंबरची नोंद घेण्यात येत असून ०२ ते ०३ दिवसानंतर त्या साईभक्तांना दुरध्वनीवरून संपर्क करुन त्यांच्या आरोग्याची माहिती घेण्यात येत असल्याचे कान्हूराज बगाटे यांनी सांगितले.

