संगमनेर । प्रतिनिधी( ऋषिकेश जगताप ):
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी येथे एका शेतकऱ्याच्या वस्तीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी दि. १२ जानेवारी रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात दोन शेळ्या व एक बकरू ठार झाले असून एक शेळी गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील पिंपरी लौकी येथील गीते वस्ती येथे तुकाराम लक्ष्मण गीते हे शेतकरी वास्तव्यास आहेत. त्यांनी सर्व शेळ्या घराजवळ असलेल्या गोठ्यात बांधून ठेवल्या होत्या. बिबट्याने मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास गोठ्यात घुसून त्यांच्यावर हल्ला चढविला.
यामध्ये दोन शेळ्या व एक बकरू ठार केले आहे. एक शेळी गंभीर जखमी केली आहे.
तुकाराम गीते हे सकाळी गोठ्याकडे गेले असता त्यांना शेळ्या या मृत्यू झालेल्या आढळून आल्या. त्यांनतर त्यांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली. वनपाल सुहास उपासनी, वन रक्षक सोनावणे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. वनपाल सुहास उपासनी यांनी याठिकाणी पिंजरा लावणार असल्याची माहिती दिली.

