प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई : लोकशाहीमध्ये विरोधकाची भूमिका अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे सत्ताधार्यांवर नियंत्रण राहते. जनतेच्या कररुपी पैशांतून करण्यात आलेली विकासकामं दर्जेदार आहेत का, त्यामध्ये काही आर्थिक 'गडबड' तर नाही ना, हे पाहून असले गैरप्रकार जनतेच्या निर्दशनात आणून देणं, सत्ताधार्यांच्या चांगल्या कामाचं कौतूक करणं त्याचप्रमाणं चुकीच्या कामांबाबत जाब विचारणं, या भूमिका निर्भिडपणे पार पाडण्यासाठी लोकशाहीमध्ये विरोधक हा अपरिहार्य असून नेवासे तालुक्यात सत्ताधार्यांना विरोध करणारा प्रखर विरोधक जीवंत रहावा, यासाठी मी राजकीय मैदानात उतरलोय, अशी भूमिका अहमदनगर दक्षिण मतदारसंघाचे माजी खासदार तुकाराम पाटील गडाख यांनी स्पष्ट केली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांच्या प्रचारार्थ मतदारांच्या गाठीभेटी दरम्यान माजी खा. गडाख वाड्यावस्त्यांवर फिरत आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अत्यंत वास्तवदर्शी प्रतिक्रिया व्यक्त केली.
ते म्हणाले, लोकशाहीत विरोधी भूमिका पार पाडणार्यांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागतं. सत्ताधार्यांचाही विरोधकांवर दबाव येतो. मात्र लोकशाहीमध्ये विरोध जीवंत ठेवणं अत्यंत महत्वाचं असतं. नेवासे तालुक्यात विरोध जीवंत रहावा, आणि विरोधकाचं खच्चीकरण होऊ नये, यासाठी आपण राजकीय मैदानात उतरलो आहोत. प्रकाश शेटे पाटील यांच्या पॅनलमधील सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन माजी खा. गडाख यांनी यावेळी केलं याप्रसंगी संभाव्य उमेदवारदेखील उपस्थित होते. दरम्यान, उद्या (दि. ४) उमेदवारांची अधिकृत उमेदवार यादी प्रसिध्द होणार असून निवडणूक चिन्हांचं वाटप होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणापासून काहीसे अलिप्त राहिलेले माजी खा. तुकाराम पा. गडाख ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाल्याने या निवडणुकीला मोठी रंगत येणार असल्याची चिन्हे आहेत. नेवासे तालुक्यातल्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि राज्याचेp जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांची राजकीय पकड असलेल्या सोनई ग्रामपंचायत निवडणुकीत 'वेगळे चित्र' पहायला मिळणार का?, याकडे सर्वसामन्यांचे लक्ष लागलंय.

