दिनांक २३ जानेवारी (तांदळी,श्रीगोंदा): श्रीगोंदा तालुक्यात तांदळी येथे शेतात उसतोड करणाऱ्या मजुराच्या पत्नीने विषारी औषध प्राशन करून, आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक २२ जानेवारी रोजी सकाळी घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तांदळी येथील शेतकरी चांदभाई गुलाब शेख यांच्या मोकळ्या शेतामध्ये पालं टाकून राहत असलेले, दिनकर शंकर चव्हाण (राहणार तळवण तांडा, पोस्ट. अमरदे, तालुका. भडगाव, जिल्हा. जळगाव) हे भाऊ व पत्नी सह नमूद ठिकाणी मागील दोन महिन्यांपासून राहत होते. दिनकर व त्याच्या पत्नी मध्ये झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सकाळी वाद झाल्यानंतर दिनकर हा त्याच्या भावासह ऊस तोडणीसाठी शेतात गेला. मात्र, कामासाठी पत्नी सुरेखा का आली नाही ? हे पाहण्यासाठी अकरा वाजता तो पालवर गेला. पालात सुरेखा जमिनीवर पडलेली आढळली. काहीतरी विषारी औषध प्याल्याचा त्याला संशय आला. दिनकर ने पत्नी सुरेखाला श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी आणले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीत ती मृत असल्याचे सांगितले.
यावरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक रामराव ढिकले करीत आहेत. शवविच्छेदन झाल्यावर मृत महिलेस अंत्यविधीसाठी तिच्या गावी तळवण तांडा येथे नेण्यात आल्याचे समजते आहे.
स्रोत:(श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा)


