कोल्हापूर:- वेगानं वाढत असलेली रुग्णसंख्या… आरोग्य सुविधांवर पडत असलेला अतिरिक्त ताण आणि बेड, ऑक्सिजन, औषधींचा तुटवडा यामुळे राज्यात आता जिल्हास्तरावर कडक लॉकडाउन निर्णय घेतले जात आहे. सातारा जिल्ह्यात आणि बारामतीमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आल्यानंतर आज सांगलीपाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली.
करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि प्रसार नियंत्रित व्हावा, यासाठी राज्य सरकारने १४ एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निर्बंध आणखी कठोर करण्यात आले. मात्र, त्याचा फारसा परिणाम विषाणू प्रसाराला आळा घालण्यावर होत नसल्याचं चित्र आहे. राज्यातील रुग्णावाढीचा आलेख कायम असून, ५० ते ६० हजारांच्या दरम्यान राज्यात रुग्णवाढ होत आहे. यात काही जिल्ह्यांतील परिस्थिती अजून चिंताजनक आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन कडक लॉकडाउन करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले जात आहे. सोमवारी (३ मे) सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आज कोल्हापूरमध्ये दहा दिवसांचा लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

