सावळीविहीर: राहाता तालुक्यातील निघोज गावातील पागिरे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वस्तीवरील ग्रामस्थ त्रासून गेली आहेत.
नगर मनमाड महामार्गापासून पुढे अर्धा किलोमीटर काँक्रिटीकरणाचा रस्ता केलेला असून त्यापुढील एक ते दीड किलोमीटरचा रस्ता संपूर्ण चिखलमय झाल्याने त्या रस्त्याने पायी चालणे कठीण झाले आहे. हा रस्ता सावळिविहीर, निघोज यांना जोडणारा शिवरस्ता आहे.
शाळेची मुले, म्हातारी माणसे, शेतकरी, रात्री अपरात्री ड्युटीवर जाणारे येणारे या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. या रत्स्याला पुढे सावळीविहीर वाडी रुई रोड मिळतो. तेथील नागरिक याच रस्त्याचा वापर करतात. रस्त्याला गाडी तर सोडा पायी चालणे मुश्कील झाले आहे. पावसाने मोठ्या प्रमाणात चिखल होत आहे. हा रस्ता रोजच्या वापरातला असून ग्रामपंचायतीला वारंवार सांगून या रस्त्याकडे लक्ष देत नाही.
त्यामुळे येथील नागरिकांच्या तिव्र भावना दुखावल्या जात आहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.



