प्रतिनिधी : प्रविण देशमुख
सालाबतपूर : (दि.२२) : गाजरगवताचे एकात्मिक पद्धतीने निर्मुलन करणे काळाची गरज असून गाजर गवत निर्मूलनासाठी मेक्सिकन भुंग्यांचा वापर करावा असे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव चे शास्त्रज्ञ श्री. नारायण निबे यांनी जनजागृती सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात सालाबतपुर, ता. नेवासा येथे प्रचार व निर्मुलन कार्यक्रमात बोलताना केले.
गाजरगवत हे परदेशी तण असून यास पांढरफुली या स्थानिक नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात सर्वप्रथम हे तण पुण्यात आढळून आले. आपल्या देशात १९५५ साली अमेरिका आणि कॅनडा या देशातून आयात करण्यात आलेल्या गव्हाबरोबर गाजरगवत काही काळातच जवळपास ३५ मिलियन हेक्टर क्षेत्रावर या तणाचा प्रसार झाला. भारताशिवाय नेपाळ, चीन, व्हियतनाम आणि ऑस्ट्रेलियाच्या विविध भागांमध्ये या गवताचा प्रसार झालेला असल्याचे श्री. निबे यांनी सांगितले.
गाजरगवताच्या स्पर्शामुळे अलर्जी अंग खाजणे, दम, श्वसनाचा त्रास होणे, सर्दी, शिंका, अंग सुजणे इ. दुष्परिणाम होत असल्याचे तसेच दुभत्या जनावरांनी खाल्यास दुधास कडू वास येणे, शेतातील पिकांबरोबर अन्नासाठी स्पर्धा केल्याने उत्पादनात घट येते, पडीक जमिनीतील जनावरांच्या चराई क्षेत्रात घट होणे, पराग कणांमुळे तेलबिया, भाजीपाला, फळे इ. पिकांच्या उत्पादनात घट होण्यासारखे प्रकार गाजर गवतामुळे होतात.
कार्यक्षेत्रात गाजरगवताचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून गाजर गवताच्या निर्मुलनासाठी जैविक पद्धतीचा अवलंब करावा असे श्री. प्रकाश बहिरट यांनी सांगितले. त्यासाठी मेक्सिकन भुंगेरे सोडावे असे त्यांनी सांगितले.
सन १९८६ मध्ये गाजर गवताच्या नियंत्रणासाठी डॉ. वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाने परभणी येथे मेक्सिकन भुंगे गाजर गवतावर सोडले असता त्यांना फार मोठ्या प्रमाणावर गाजर गवताचा नाश झाल्याचे आढळून आले असल्याचे सांगितले.
गाजर गवताचे नियंत्रण हे सामुहिक प्रयत्न करून एकात्मिक पद्धतीने नियंत्रण सहज शक्य असल्याचे श्री. निबे यांनी सांगितले. त्यासाठी ज्या ठिकाणी गाजर गवत वाढलेले आहे ते फुलोऱ्यात येण्याच्या अगोदर उपटून नस्ट करावे, गाजर गवत निर्मुलन करणेसाठी जनजागृती करणेसाठी किसान गोष्टी, गाजरगवत निर्मुलन प्रात्याक्षिकांचे आयोजन करावे, सार्वजनिक जागेवरील गाजरगवताचे रासायनिक पद्धतीने करावे. गाजर गवताच्या उच्चाटनासाठी शेतात प्रति हेक्टरी ५०० झायगोग्रामा/ मेक्सिकन भुंगे सोडण्याचे श्री. निबे यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमास सलाबतपुर गावातील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब निकम, रावसाहेब निकम, विनोद आढागले व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्वांनी शेताच्या कडेला असलेले गाजरगवत उपटून त्याचे निर्मूलन केले.

