निरा नदीवरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून द्यावेत - हर्षवर्धन पाटील
- कार्यकारी अभियंता धोडपकर यांचेशी चर्चा
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यात निरा नदीवरती असलेले नीरा नरसिंहपूर ते तावशी दरम्यानचे कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांमध्ये उशिराने पाणी अडवल्याने यापैकी अनेक बंधाऱ्यांमध्ये सध्या अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. सध्या नीरा डावा कालव्याला आवर्तन सोडण्यात आले असून, या कालव्यातील पाण्यातून नीरा नदीवरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरून यावेत, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांचेकडे शुक्रवारी ( दि.२६) केली.
इंदापूर तालुक्यातुन वाहणा-या निरा नदीवर नरसिंहपूर, गिरवी, ओझरे, लुमेवाडी, सराटी, भगतवाडी, पिठेवाडी, चाकाटी, बोराटवाडी, खोरोची, निरवांगी, निमसाखर, कळंब , चिखली, कुरवली, जांब, तावशी हे १७ बंधारे आहेत. सदरचे बंधारे वेळेवर न अडल्याने सध्या अनेक बंधारे कोरडे पडण्याच्या मार्गावरती आहेत. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात बंधाऱ्याचे पाण्यावरती अवलंबून असणारी शेती धोक्यात येणार आहे. सध्या नीरा डावा कालवातून आवर्तन सोडण्यात आलेले असून, पावसामुळे शेतीच्या पाण्याला अधिक मागणी नसल्याने, नीरा डावा कालव्याच्या पाण्यातुन सदरचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. या यासंदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी पुणे पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांचेशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. या मागणीवर जलसंपदा विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी सांगितले. जर नीरा नदीवरील वरील बंधारे भरून घेणे संदर्भात तातडीने नियोजन करण्यात आले नाही, तर मात्र भाजपच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.
_______________________________

