शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२१
अहमदनगर -भाऊबीजेसाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा विहीरीत मृत्यु झाल्याची घटना नगर तालुक्यातील वाळकी येथे बुधवारी (दि .१०) सकाळी ९ वा. घडली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
विहीरीत पडून मृत्यु झालेल्या विवाहितेचे नाव शुभांगी कैलास बाबर ( वय ३१,रा.कानडी बेलगाव ता. कर्जत) असून ती आपल्या दोन चिमुरडया मुलांसह भाऊबीजेसाठी आपल्या माहेरी गोवर्धन पिराजी बोठे ( रा. वाळकी ) यांच्या घरी आली होती.
बुधवारदि .१० रोजी सकाळी ९ च्या सुमारास घराच्या पाठीमागे असलेल्या विहिरीत ती पडल्याची घटना घडली. घरच्यांचे लक्ष जाताच तिला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला . मात्र विहीर जुनी असल्याने झाडाझुडपामुळे तिला वाचविण्यात अपयश आले. नगर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने विहिरीतील विवाहितेचा मृतदेह बाहेर काढण्यात येऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
घटनेची माहीती कळताच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, मा.जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ, सरपंच शरद बोठे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील सुत्र हलविली. घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी भेट देऊन पाहणी केली .
दरम्यान मयत महिलेस दोन लहान मुले असून , पती लष्करी सेवेत आसाम येथे कार्यरत आहे.
भाऊबीजेसाठी आलेल्या विवाहितेचा विहीरीत पडून मृत्यु झाल्याने वाळकी व बेलगावात शोककळा पसरली.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

