शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक २५ डिसेंबर २०२१
गावकुसातल्या गोष्टीला ' दीनमित्र ' कारच्या नावाचा पुरस्कार लाभणे हे प्रेरणादायी- डॉ. शिवाजी काळे..!!
अहमदनगर : माझं पहिलं पुस्तक हे 'गावकुसातल्या गोष्टी ' असून अशा पुस्तकाला भारतातील पहिले ग्रामीण पुरोगामी विचारांचे पत्रकार 'दीनमित्र' कार मुकुंदराव पाटील यांच्या नावाचा पुरस्कार लाभणे हे माझ्या पुढील लेखनाला प्रेरणादायी असल्याचे मत साहित्य प्रबोधन मंचचे अध्यक्ष डॉ. शिवाजी काळे यांनी व्यक्त केले.
गुरुनानक नगरमध्ये डॉ.शिवाजी काळे यांच्या पहिल्याच 'गावकुसातल्या गोष्टी ' या पुस्तकाला नुकताच तरवडी येथील 'दीनमित्र'कार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते मिळाला. त्याबद्दल डॉ. काळे यांचा साहित्य मित्रपरिवारातर्फे सन्मान करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ.बाबुराव उपाध्ये, संगमनेर येथील साहित्यिक प्रा.दिलीप सोनवणे, घनश्याम बोबडे, नगर येथील पुस्तक प्रकाशक श्री.अंबर काळे, रामदास औताडे यांनी सत्कार करून डॉ. शिवाजी काळे यांच्या 'गावकुसातल्या गोष्टी'विषयी चर्चा केली.
डॉ. शिवाजी काळे यांनी आपल्या पुस्तकातील गोष्टी ह्या तेलकुडगाव, कुकाणा, नेवासा, शेवगाव, श्रीरामपूर या परिसरातील शेतशिवार आणि माणसांचे हलकेफुलके जीवनदर्शन चित्रित केले असून कोरोना आणि माणसांची अगतिकता, गावातले गटतट आणि व्यक्तीच्या मधील वल्लीपणा विनोदाच्या, नगरी बोलीतून व्यक्त केल्याचे सांगितले.
डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सांगितले की, डॉ. शिवाजी काळे यांच्या गावकुसातल्या गोष्टी ह्या मराठीतल्या मैलाचा दगड ठरणाऱ्या अलीकडच्या साहित्यिकांना दिशादर्शक ठरतील असे सांगून ही कथा हसवता हसवता अंतर्मुख करते असे मत व्यक्त केले. प्रा. दिलीप सोनवणे यांनी डॉ. शिवाजी काळे यांचा सत्कार करून डॉ. बाबुराव उपाध्ये यांची दीर्घ प्रस्तावना ह्या कथासंग्रहाचे मूल्य सांगणारी आहे, असे कौतुक केले. अंबर काळे, घनश्याम बोबडे, रामदास औताडे यांनी अशी पुस्तके वाचण्यात आल्यावर वाचनप्रियता वाढेल असे मत व्यक्त केले. सुयश काळे यांनी आभार मानले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

