अपघात टाळणेसाठी मोटार वाहन दंडामध्ये वाढ -नंदकिशोर पाटील
- वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन
फोटो :- नंदकिशोर पाटील, परिवहन अधिकारी
इंदापूर :प्रतिनिधी (दि.२५ डिसेंबर २०२१)
दुचाकीवरून हेल्मेटशिवाय प्रवास केल्यास पहिल्या वेळी रु. ५०० तर दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास हा दंड रु.१५०० भरावा लागणार आहे. हेल्मेट नसल्यामुळे अनेक दुचाकीस्वारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षित प्रवास व्हावा, यासाठी शासनाने १ डिसेंबर पासून मोटार वाहन कायद्यात सुधारणा करून दंड रक्कमेत मोठी वाढ केली आहे.
देशात आणि राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहन चालक वाहतुकीचे नियम पाळत नसल्याने बहुतांशी अपघात मानवी चुकीमुळे होत आहेत. मात्र दंडाची रक्कम कमी असल्यामुळे नियम मोडले तरी रक्कम भरून वाहनचालक सुटका करून घेत होते. त्यामुळे दंडाच्या रकमेतही मोठी वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती बारामती विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांनी दिली. बारामती विभागामध्ये बारामती, इंदापूर, दौंड तालुके येतात. वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलण्याचा दंड रु. ५०० करण्यात आला आहे. आता दुचाकीवरील ट्रिपल सीटसाठीचा दंड रु. १ हजार पर्यंत वाढवला आहे. विना परवाना वाहन चालविल्यास ५ हजार रुपयाचा दंड असेल, फॅन्सी नंबर प्लेट वापरणे रु.१ हजार, भरधाव वाहन चालविणे रु. ५ हजार , कणकर्श आवाज रु.1 हजार, वेगात वाहन चालविणे रु. ५ हजार, रुग्णवाहिका, अग्नीशामक वाहनाला अडथळा निर्माण करणे - रु.१० हजार प्रमाणे दंड लावला जाणार आहे. ही कार्यवाही ई - चलन प्रणालीद्वारे सुध्दा केली जाते आहे, अशी माहिती नंदकिशोर पाटील यांनी दिली. सुरक्षित प्रवास करून आपल्या व इतरांच्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
_____________________________

