जंगलांचा एकीकडे वेगाने -हास होत आहे. शासनाचा निव्वळ खर्च होत आहे.हे सर्रास घडत आहे.यावर वेळेतच उपाययोजना झाल्या तर पुढचा अनर्थ टळला जाऊ शकतो...?
वाढते तापमान भाजुन काढत आहे. आत्ता दुपारी मी माहीम मुंबईमधे आहे. मी थोड्या वेळापूर्वी बाहेर प्रत्यक्ष तापमान ४२°से नोंदले आहे. आज वसुंधरा दिन, २२ एप्रिलआहे.उष्णता का वाढत आहे? याऐवजी भारनियमन का करावे लागते आणि ते टाळता कसे येईल? यावर सरकारचा चुकीचा विचार चालू आहे.
वीजेचा वापर कमी होऊन दिलासा मिळावा म्हणून या दिवसांत, एप्रिल महिन्यात पाऊस पडावा, अशी निसर्ग चक्राच्या विरोधात जाणारी अपेक्षा ऊर्जामंत्री बाळगत आहेत तर मुख्यमंत्री, वीजेच्या बचतीचा व त्याच वेळी खाजगी कंपन्यांना वीजनिर्मिती वाढवण्याचा सल्ला देत आहेत. मुळात प्रश्न औद्योगिकरणाशी जोडला आहे आणि औद्योगिकरण या क्षणी थांबण्याची गरज आहे. मात्र या सत्याला अव्यावहारिक ( impractical ) गोष्ट मानले जाते आणि कृत्रिम भौतिक साधनांवर आधारित जीवनशैली, जी पृथ्वीवर केवळ विज्ञानरंजन कथांमधेच असायला हवी होती तिला practical मानले जात आहे.
हवामान खाते नेहमीप्रमाणे जास्त दाब - कमी दाब, वेस्टर्न डिस्टर्बन्स, अशी रूढ अर्थशून्य स्पष्टीकरणे देत आहे. वेधशाळा तापमानाचा आकडा कमी करून फसवत आहे. आजच्या तापमानाचा त्यांनी जाहीर केलेला आकडा उद्या पहावा. दोन्ही यंत्रणा परिस्थितीचे गांभीर्य लपवत आहेत.
उद्योग, वीजनिर्मिती, बांधकाम, वाहतूक व रासायनिक - यांत्रिक शेती, एकूण औद्योगिक जीवनशैली, तापमानवाढीस कारण आहे, हे मान्य करण्यास माणसे अजूनही तयार नाहीत. मोटार, वीज व सीमेंट 'कार्बन डाय ऑक्साईड' वायूच्या सुमारे ९५ % निर्माणास कारण आहेत, परंतु ते मान्य केले आणि या गोष्टी टाळल्या, तर जगणे कसे शक्य आहे? अशी भ्रमिष्ट भाषा केली जात आहे.
आपण हवा, पाणी आणि अन्नामुळे जगतो आणि उद्योगपूर्व काळात, नैसर्गिक शेती, चरखा हातमागावरील वस्त्र आणि माती - बांबू व कुडाच्या घरांनी शाश्वत जीवन शक्य केले होते, हे साधे सत्य अडचणीचे वाटत आहे.
पृथ्वीच्या सरासरी तापमानात, मानवजात वाचवण्यासाठी रोखली जावी असे पॅरिस करारात सांगितलेली २°से ची वाढ झाली आहे असे ऑगस्ट २०२० मधे नासा व इतर संस्थांनी नोंदले आहे. ३°से ची वाढ फक्त ३ वर्षांत म्हणजे सन २०२५ मधे होणार आहे. आयपीसीसी ही संस्था मात्र ही वाढ या शतकाच्या शेवटी होईल असे सांगून पूर्ण गाफील ठेवत आहे. यामुळे वीजेच्या तुटवड्यावर, अधिक कोळसा उत्खनन व अधिक वीजनिर्मिती असा परिस्थिती अधिक भीषण व दुष्टचक्र तीव्र करणारा उपाय अज्ञानातुन केला जाऊ शकतो. सध्या वातानुकूलनासाठी सुमारे ४५% वीज वापरली जाते. वाढत्या उष्णतेमुळे वातानुकूलनाचा (एसी- नेहमीपेक्षा चार - पाचपट वीज) वीज वापर वाढला की निर्मितीसाठी अधिक कोळसा जाळला जाणार, अधिक जलविद्युत साठी कार्बन शोषणाऱ्या हरितद्रव्याचे अधिक जंगल बुडवले जाणार. औद्योगिकरण हा मुळात सापळा आहे.
आम्हाला यातले काही कळत नाही, अशी भूमिका बहुतांश जनतेची आहे. तापमानवाढीने निर्माण केलेल्या अस्तित्व गमावण्याच्या संकटापुढे निरर्थक अशा राजकारण, मनोरंजन, युध्द इ. मधे तथाकथित आधुनिक मानवजात गुंतली आहे.
आपल्या शरीराचे तापमान ३°से ने वाढले तर काय होते, हे तरी लोकांना माहीत असावे. तेच आता पृथ्वीवर ठीकठिकाणी उच्चतम तापमानात घडणार आहे. भयंकर गोष्ट ही आहे की, सरासरी तापमानात दर ५ वर्षांत १ °से ची वाढ होत राहणार आहे. घरात एसी, मोटारीत एसी आणि कार्यालयात एसी लावुन आपण 'कूल' आहोत असे समजणाऱ्यांनी हे वाक्य लक्षात घ्यावे की, *"मानवजात व जीवसृष्टी पुढील फक्त २० ते ३० वर्षांत पृथ्वीवरून नष्ट होत आहे".* एका वृत्तपत्राचे संपादक दोन दिवसांपूर्वी जनतेचे ऊर्जांबाबत प्रबोधन? करताना म्हणाले की येती ५०- ६० वर्षे तरी खनिज स्त्रोतांना पर्याय नाही. या आत्मघातकी विचाराला मार्गदर्शन म्हटले जात आहे.
औद्योगिकरण म्हणजे प्रगती ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. ते क्षणोक्षणी माती, पाणी आणि वातावरणाची अक्षम्य हानी करत आहे. पृथ्वी जीवन देण्यासाठी आहे, नोकरी देण्यासाठी नाही.
औद्योगिक जीवनशैली कोसळणे ही अटळ गोष्ट आहे. दहिहंडी फोडण्यासाठी केलेला मनोरा कोसळला तर दुखापत होते परंतु तो कौशल्याने उतरवला तर इजा होत नाही. औद्योगिक मनोरा कोसळला की त्याखाली मानवजात व जीवसृष्टी बळी जाणार आहे. तो उतरवणे तात्काळ सुरू व्हायला हवे. परंतु वास्तव लपवुन ठेवून तो मनोरा अधिक उत्तुंग करण्याचा म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न होत आहे. याला 'विकास' नाव दिले आहे.
आपली मुले, नातवंडे वाचवण्यासाठी जनतेने ताबडतोब भानावर यावे. नैसर्गिक जगात, उद्योगपूर्व शेतीयुगात परत जावे.
आपला
ॲड. गिरीश राऊत
निमंत्रक
भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ
दू. ९८६९ ०२३ १२७
कृपया सर्वत्र पाठवा..

