देवळाली प्रवरा :-
देवळाली प्रवरा येथील कदम - काकडे, वरखडे - नालकर व सांबारे - वाडकर वस्ती जवळील भंडारदरा धरणाच्या कॅनॉल वर ये जा करणेसाठी आवश्यक असलेल्या पादचारी लोखंडी पुलाचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी सांगितले.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ढुस यांनी म्हंटले आहे की, देवळाली प्रवरा येथील कदम - काकडे, वरखडे - नालकर व सांबारे - वाडकर वस्ती जवळील भंडारदरा धरणाच्या कॅनॉल वर ये जा करणेसाठी येथील नागरिकांची अत्यंत गैरसोय होत होती, पाटाला पाणी आल्यावर येथील शाळकरी मुलांना जवळपास एक ते दोन किलोमीटर वळसा घालून शाळेत जावे लागते, दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा जनावरांचा चारा वाहतूक असेल, दूध उत्पादक शेतकरी यांना दूध वाहतूक आणि वयोवृध्द नागरिकांची पाट ओलांडताना होणारी गैरसोय पाहता वरील तीनही वस्तीवरील नागरिकांच्या लेखी मागणीवरून आम्ही दि. २० जून २०२२ रोजी प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांचे मार्फत पाटबंधारे राज्यमंत्री मा. ना. बच्चूभाऊ कडू यांना निवेदन देऊन येथे तात्काळ लोखंडी पादचारी पूल करून मिळणेची मागणी केली होती.
नामदार बच्चूभाऊ कडू यांचे आदेशाने उपरोक्त ठिकाणी तात्काळ लोखंडी पादचारी पूल बसवून देणेकामी कार्यवाही सुरू झाली असून आज पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी तीनही वस्तीला समक्ष भेट देऊन पुलांच्या जागेची पाहणी केली आहे. लवकरच या पुलांचा प्रश्न मार्गी लागणार असून येथील नागरिकांची होणारी गैरसोय थांबणार आहे. त्याबद्दल प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीतदादा पोटे व नामदार बच्चूभाऊ कडू यांचे आप्पासाहेब ढुस यांनी आभार व्यक्त केले.

