शौकतभाई शेख श्रीरामपूर:-
सध्या लम्पी आजारामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी व शेतमजूर हतबल झाले असून अनेक जनावरे या आजारामुळे दगावली आहे. याबाबत राज्य शासन उदासीन असून केवळ घोषणाबाजी करण्यात मश्गुल आहे. शासनाने लम्पी आजाराबाबत केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्षात जनावरांच्या लसीकरणाचा वेग वाढवावा तसेच ज्या दूध उत्पादक, शेतकर्यांची जनावरे दगावली आहेत त्यांना शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सदा कराड यांनी केली आहे.
श्री सदा करााड
यासंदर्भात श्री.कराड यांनी पुढे म्हटले आहे की, राज्यात पशुवैद्यकिय अधिकार्यांची संख्या अत्यंत कमी असून एका पशुवैद्यकिय अधिकार्याकडे सहा ते सात गावे सोपविलेली आहे. ग्रामीण भागात वाड्या, वस्त्यांवर व शहरी भागात जनावरांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पशुवैद्यकिय अधिकारी हतबल झाले असून लसीकरणाचे काम अत्यंत धिम्या गतीने चालू आहे. याबाबत शासनाने खाजगी पशुवैद्यकिय अधिकार्यांची मदत घेऊन जनावरांच्या लसीकरणाचा वेग वाढवावा जेणेकरुन गोवंश वाचेल, असे श्री.कराड म्हणाले.
राज्य शासनाने जनावरांचे लम्पी आजाराचे लसीकरण संदर्भात तातडीने उपायोजना न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सदा कराड, अरुण पाटील, अशोकराव थोरे, शेखर दुबैय्या, अशोक पवार, ज्ञानेश्वर वडीतके, नानासाहेब बडाख, बाळासाहेब ढोरमारे, पांडूरंग पवार, दत्तात्रय जाधव, विजय तिवारी, नितीन लोळगे, बाळासाहेब मेटे, शरद भणगे, बाळासाहेब खताळ, गोकुळ आदिक, कचरु शिरसाठ आदींनी दिला आहे.

