मुंबई । १० ऑक्टोबर २०२२ :-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला मोठ्या संकटांना सामना करत १०० दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानिमित्त मंत्र्यांच्या आणि सर्व आमदारांच्या कामाचा आढावा घेतला जात होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरच कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे खासगी सचिव बालाजी खतगावकर यांच्यात वाद झाला. सत्तारांनी सांगितलेले काम वेळेत न केल्यामुळे हा वाद झाल्याचे बोलले जाते. त्यावेळी सत्तारांनी खतगावकर यांना शिवीगाळ केल्याची माहिती समोर येत आहे.
दुसरीकडे कामाचा आढावा नव्हे तर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर पुढील रणनीति ठरवण्यासाठी शिंदे गटाने वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. या बैठकीत ही बाचाबाची झाली असल्याची माहिती आहे. शिविगाळ प्रकरणानंतर सत्तार यांनी वर्षा बंगल्यातील बैठक अर्ध्यावर सोडली आणि माघारी गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाच्या खासदार, आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक वर्षा बंगल्यावर बोलवण्यात आली होती. या बैठकीला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचीही उपस्थिती होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीत कामकाजाचा आढावाही घेत होते. यावेळी बैठकीला उपस्थित असलेले अब्दुल सत्तार हे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवांवर भडकले आणि त्यांना शिविगाळ केली.
या बैठकीत अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघातील कामांची यादी देऊनही ती पूर्ण न झाल्यानं ते संतापले होते. विकासकामांचा आढावा घेताना रखडलेल्या कामामुळे सत्तार भडकले होते. यात मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवासोबत त्यांची खडाजंगी झाली. हा विषय नंतर सोडवता येईल असं सांगत इतर आमदार, मंत्र्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु रागात ते बैठकीतून निघून गेले. घडलेल्या या प्रकारामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तारांच्या वागणुकीवर नाराज झाल्याचं पुढे येत आहे.

