शासनाची कोट्यवधीची फसवणूक, चौकशी समिती नियुक्त
प्रतिनिधी : संजय वायकर
अक्कलकोट दि .२५ / अक्कलकोट येथील प्रतिष्ठित केएलई मंगरुळे प्रशालेत गेल्या दहा वर्षापासून सलग शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार सुरू आहे.
शासनाचा आदेश डावलून स्थानिक अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन विनाअनुदानित तुकड्या मधील सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांना सलग दहा वर्षे शासनाची दिशाभूल करून शालेय पोषण आहार लाटण्याचे काम सुरू आहे. मुख्याध्यापक गिरीष बसवराज पट्टेद यांनी शालेय पोषण आहाराच्या ठेकेदाराशी संगनमताने फार मोठा गैरव्यवहार केलेला आहे.शासनाचे सुमारे दोन कोटीची फसवणूक झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
विनाअनुदानित वर्गांना शालेय पोषण आहार देय नसल्याचे स्पष्ट आदेश असताना स्थानिक अधिकाऱ्यांना आर्थिक लाभ देऊन आत्तापर्यंत शालेय पोषण आहार लाटण्याचे काम पट्टद् यांनी केले.कहर म्हणजे संस्थेने आपल्याला असे करण्यास सांगितल्याचे पट्टद् यांनी चौकशी अधिकाऱ्यापुढे सांगितले आहे. त्यामुळे संस्थेचे काही पदाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.याच संस्थेच्या बार्शी येथील शाळेने दोन वर्षांपूर्वी शालेय पोषण आहार प्रकरणातील भ्रष्टाचार अधिकाऱ्यांना धरून दडपले होते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सामाजिक कार्यकर्ते स्वामीनाथ हरवाळकर यांनी सर्व पुरावे माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांच्याकडे सुपूर्त केले आहे. त्यांनी या गंभीर घटनेची दखल घेऊन शासकीय चौकशी समिती नियुक्त केली आहे.
महाराष्ट्रातला शालेय पोषण आहारातला हा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचे बोलले जात आहे.

