प्रतिनिधी : आसावरी वायकर
पंढरपूर : १० / "पूज्य साने गुरुजींनी दलितांना आणि वारकऱ्यांना विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन केले. त्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली. तनपुरे महाराजांच्या ३७ सा.व्या पुण्यतिथी निमित्त, साने गुरुजींच्या स्मारकाचे अनावरण होत आहे, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. साने गुरुजींनी, सामान्यांना प्रेम देऊन,त्यांना समतेचा धडा शिकविला" असे विचार राष्ट्रीय नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केले.
पंढरपूरच्या तनपुरे महाराज मठात साकार होत असलेल्या साने गुरुजी स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते.
यावेळी ह.भ.प. बद्रीनाथ तनपुरे महाराज,आमदार बबनदादा शिंदे,साथी पन्नालाल सुराणा, माधव कारंडे, अभिजीत पाटील, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर,माजी मंत्री,प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, उपेंद्र टण्णू, ह.भ.प. रामदास जाधव, ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर यांच्यासह राष्ट्र सेवा दलाचे सैनिक, वारकरी मंडळी, साने गुरुजी कथामालाचे कार्यकर्ते, यांची उपस्थिती होती.
साने गुरुजी आणि वसंत बापट यांच्या प्रार्थना गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. साने गुरुजी स्मारक समितीचे अध्यक्ष राजा अवसक यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी आमदार बबनदादा शिंदे, अभिजीत पाटील, प्रा.लक्ष्मणराव ढोबळे इ.नीं मनोगते व्यक्त केली. या सोहळ्याचे औचित्य साधून भावजागरण दिंडीचेही आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी मुंबई- पुण्याच्या कथामालेचे शामराव कराळे, लालासाहेब पाटील, रमेश काळे, अपर्णा निरगुडे, सोलापूर कथामालेचे-- अशोक खानापुरे, सुनील पुजारी, अशोक म्हमाणे, अरुणकुमार धुमाळ, रामचंद्र धर्मसाले,गणेश लेंगरे, गुरुशांत तोंडावळे, पंढरपूर कथामालेचे. राजूभाई मुलाणी, धनंजय नाईक- नवरे यांच्यासह रत्नागिरी, अंमळनेर,मिरज,सांगली, पुणे, मुंबई, नाशिक, नगर इ. ठिकाणाहून राष्ट्रसेवादल व साने गुरुजी कथामाला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. वारकऱ्यांची संख्याही लक्षणीय होती.

