शौकतभाई शेख । श्रीरामपूर:
अहमदनगर शहरातील डॉ. ना.ज. पाऊलबुधे शैक्षणिक संकुल येथे जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने शनिवार दिनांक १० डिसेंबर २०२२ रोजी भव्य दिव्य बालकवी सन्मान सोहळा रंगला. या सन्मान सोहळ्यामध्ये शहरातील बालकवींचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी दर्जेदार कवितांचे सादरीकरण केले.
स्वलिखित कवितांचा सुमारे ९०० विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला. अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ग्रामीण कवी आनंदा साळवे होते. प्रमुख अतिथी युवा कवी तथा व्याख्याता कार्तिक झेंडे,अहमदनगर शहरातील नामांकित बांधकाम अभियंता नानासाहेब जीवडे, डॉ. ना.ज. पाऊलबुधे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य भरत बिडवे सर, श्रीनाथ विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ अनिता सिद्दम मॅडम उपस्थित होते.कार्तिक झेंडे या युवा कवीने सुंदर अशा शेतकऱ्यांची शेतकरी जीवनावरील तसेच विद्यार्थी जीवनावरील कविता विद्यार्थ्यांना ऐकवल्या. विद्यालयाचे प्राचार्य भरत बिडवे सर यांनी विद्यार्थ्यांना कविता लिहिण्यासाठी शिक्षणापेक्षा आपल्या मनातील भावना कागदावर उतरवता आल्या पाहिजे अशा प्रकारची भावना व्यक्त केली. नानासाहेब जीवडे यांनी फक्त आई वडील अशा मर्यादित स्वरूपात साहित्य न लिहिता साहित्य लिखाणात समाजातील सर्व व्यथा व सर्व विषयांना स्पर्श करणाऱ्या साहित्याचे लिखाण व्हावे असे विचार मांडले. श्रीनाथ विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ सिद्दम मॅडम यांनी सन्मानित बालकवींचे तोंड भरून कौतुक केले. या बालकवींपासून सर्व विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन अशाच प्रकारचे लिखाण करण्याचे प्रयत्न करावे अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामीण कवी तसेच हमाली करून उदरनिर्वाह करणारे असूनही त्यांनी विद्यार्थ्यांना जे जीवन आपण जगतो ते कवितेतून मांडता आले पाहिजे. कविता करणे फार अवघड नाही. आसपासच्या परिसराचे निरीक्षण केले असता सहज कोणत्याही परिस्थितीचे वर्णन आपण साहित्यातून मांडू शकतो. शिक्षण हा भारतीय जीवनाचा कणा आहे. आपण अभ्यासपूर्वक शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षण न घेतल्यास अडाणी माणसाचे जीवन हे फार खडतर असते असे त्यांनी स्व अनुभव सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
आनंदा साळवे यांनी झोपडी ही त्यांची अतिशय हळवी कविता तसेच सासु सुना ही विनोदी कविता सादर करून विद्यार्थ्यांना खूप हसवले. या कार्यक्रमाचे आयोजन जीवन गौरव मासिकाचे महाराष्ट्र राज्याचे उपसंपादक देविदास बुधवंत व रज्जाक शेख सहसंपादक जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य यांनी केले.पूर्ण कार्यक्रमाला मार्गदर्शन जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्याचे मुख्य संपादक रामदास वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजक देविदास बुधवंत यांनी या आठ विद्यार्थ्यांवर माझे समाधान होत नाही. तर पुढील वर्षी शहरातून ५० ते १०० बालकवी एकत्र करून एक भव्य दिव्य बालकाव्य संमेलन घेण्याचे बोलून दाखवले. सूत्रसंचालन डॉ. ना.ज.पाउलबुधे माध्यमिक विद्यालयाचे अध्यापक दीपक परदेशी यांनी केले व आभार विष्णू मगर यांनी मानले.

