*स्वयंशिस्त कायम टिकावी
*रमजानुल मुबारक = २८*
लेखन- सलीमखान पठाण श्रीरामपूर - 9226408082
पवित्र रमजान महिन्याची उदया सांगता होण्याची दाट शक्यता आहे.महिना कसा गेला ते समजले देखील नाही. महिनाभर रोजे, पाचवेळची नमाज, तरावीहची नमाज,
सहेरी,इफ्तार या दिनक्रमामुळे दररोजच्या जीवनाला एक दिशा प्राप्त झाली. वेळेची शिस्त निर्माण झाली. सर्व कामे वेळेवर करण्याची स्वयंशिस्त निर्माण झाली. उन्हाळ्याची तीव्रता असतांना देखील अल्लाहच्या भक्तांनी रोजे धरले,प्रार्थना केली. सर्व धार्मिक विधी पार पाडले. विशेष म्हणजे रमजान महिन्यात काय केले पाहिजे हे अल्लाहने नमूद केले,भक्तांनी स्वतः त्याप्रमाणे आचरण करण्याचा निर्णय घेतला व त्यावर अंमल केला. तहान लागलेली असतांना व समोर पाणी उपलब्ध असतांना त्याला हात ही लावला नाही हे नियंत्रण स्वतः मध्ये निर्माण केले.यासाठी कोणताही कायदा करावा लागला नाही.
हीच स्वयंशिस्त मानवाला अध्यात्माकडे प्रोत्साहीत करते.ईश्वराने मानवाच्या भल्यासाठी सर्व प्रकारच्या साधनांची निर्मिती केली.अन्नसेवन करतांना किंवा केल्यानंतर त्रास होऊ नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला , फळे,कंद आदि उगवले. मानवी शरीराला अपाय होऊ नये यासाठी अनेक प्रकारच्या जडीबुटी निर्माण केल्या.निरर्थक अशी एक ही गोष्ट या सृष्टीत निर्माण केलेली नाही.मात्र मानवाला त्यांचा योग्य प्रकारे उपभोग घेता आलेला नाही.सृष्टीच्या निर्माण कर्त्या परमेश्वराने सर्व सोयी सुविधा निर्माण केल्या मात्र आपण त्याचा योग्य विनियोग न करता गैरवापर केल्याने मानव आज अडचणीत सापडला आहे.
अल्लाहने कुरआन शरीफच्या माध्यमातून मानवासाठी आचारसंहिता निर्माण करून दिली आहे. प्रत्येकाने त्याप्रमाणे वर्तन करायचे, वागायचे आहे.आपल्या सर्व कर्माचे आडिट कयामतच्या दिवशी होणार आहे. या जगात जीवन जगतांना केलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट कार्याचा खाते उतारा (नाम ए आमाल किंवा आमालनामा) आपल्याला त्या दिवशी मिळेल आणि त्याप्रमाणे आपल्याला स्वर्ग कि नरक याचा फैसला झालेला असेल.जे जे चुकीचे केले असेल त्याची परतफेड करावी लागेल.सर्व हिशोब काटेकोर असेल.तेथे समायोजन नाही.कारण आपल्या सर्व कार्याचा आडिटर अल्लाह आहे. दुनियेतला आडिटर लाच घेऊन तुमच्या बाजूने सकारात्मक अहवाल देईल मात्र तो जगाचा आडिटर कोणतीही लाच घेत नसल्याने तो अहवाल जसा येईल तसा निकाल आपल्याला मान्य करावा लागेल. म्हणून प्रत्येकाने सचोटीचा स्विकार करावा व त्याप्रमाणे जीवनक्रमण करावे हाच एकमेव पर्याय आहे.
अजून खूप काही घडणार आहे.
पवित्र रमजान महिना कसा निघून गेला ते कळले देखील नाही.प्रेषित हजरत पैगंबरांनी याबाबत असे सूतोवाच केलेले आहे कि ज्यावेळी कयामतचा कालावधी जवळ येईल,तेव्हा दिवसाची बरकत निघून जाईल.आता हेच पहा ना.नवीन वर्ष सुरू होऊन जवळ जवळ चार महिने झाले.पण असं वाटतंय कि नवीन वर्ष कालच सुरू झाले. दिवस असा निघतोय आणि असा मावळतोय.जीवनाचा एक एक दिवस कमी होत आहे.आपण मात्र वाढदिवस साजरे करतोय.निसर्गाच्या नियमाविरुद्ध आपले वर्तन सुरू आहे.
कोरोनाच्या एका छोट्याशा अतिसूक्ष्म विषाणूने जगाची सर्व गणितं बदलून टाकली आहेत.माणूस,ज्याला आपल्या प्रत्येक कृत्यावर फार गर्व होता. त्याचे गर्वहरण झाले आहे.चांगले चांगले गर्भश्रीमंत धन,संपत्ती असूनही ज्यावेळी कोरोना ने निधन पावले तर त्यांना शेवटचा निरोप द्यायला पी पी किट मधील दोन माणसांशिवाय तिसरा माणूस नव्हता.सत्ता, संपत्तीचं मूल्य सध्या शून्य आहे हे सिद्ध झाले.
हे सर्व दिवस आपल्याला का पहावे लागत आहेत ? याचा अध्यात्मिक दृष्ट्या अभ्यास केल्यास असे दिसून येते कि आपले स्वैर वर्तन याला कारणीभूत आहे. आपण ईश्वराचा सांगितलेला मार्ग सोडून गैरमार्गाने परिक्रमण सुरू केल्याने या सर्व बाबी घडत आहेत.माणसाने सर्व प्रकारची नैतिक बंधने तोडून आपल्या मनमानी पद्धतीने जगण्यास आणि वागण्यास सुरुवात केली. ईश्वर आणि अल्लाहची भीती मनात न ठेवता स्वैराचारी वागणूक आणि वर्तन केल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
एका सूक्ष्म विषाणू पुढे सर्व काही हतबल झाले. आता तरी आपण सुधारणार आहोत का? कारण कुरआनमध्ये अल्लाहने म्हटल्याप्रमाणे जगाचा विनाश जवळ आला असून अनेक मोठ्या घटना त्यात घडणार आहेत. या सर्व घटनांना सामोरे जाण्याची तयारी आपण केली आहे का ?जे घडतंय ते आपण रोखू शकत नाही,पण आपले वर्तन बदलून जगत निर्मात्याची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मात्र आपण करू शकतो. यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतःवर काही नैतिक व सामाजिक बंधने लादून घेऊन आपल्या मनातील भावनांना आवर घालून ईश्वर आराधनेचा मार्ग स्वीकारण्याची आवश्यकता आहे. समाजातील गरजूंना मदत करणे म्हणजे ईश्वराची मदत करणे आहे. स्वार्थाचा त्याग करून परमार्थकडे वळण्याची आवश्यकता आहे. हे जर आपण केले नाही तर येणारे दिवस खूप वाईट आहेत.आपण हतबल, निर्बल आहोत. आपल्या जवळची माणसं अचानक पणे आपल्याला सोडून गेली. आपण काही करू शकलो नाही. आपल्या हातात काहीच नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. प्रत्येकाने आपल्या धार्मिक रीतीरिवाजाप्रमाणे सत्य मार्गाचा अवलंब करावा आणि ईश्वर,अल्लाहची नाराजी दूर करण्यासाठी त्याने दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा येणार्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे.
रमजानुल मुबारक या लेखमाले द्वारे दैनिक सार्वमत मध्ये मार्गील पंचवीस वर्षे व या वर्षी दैनिक कॉमन न्यूज, दैनिक साई संध्या या सह समाज माध्यमातून इस्लाम धर्माबद्दलची माहिती इतर धर्मिय बंधू भगिनीपर्यंत पोहोचवून इस्लामचा खरा परिचय करून देण्याचा अल्पसा प्रयत्न गेली २६ वर्ष मी करीत आहे.वाचकांचा या लेखमालेस मिळालेला प्रचंड प्रतिसाद हा खऱ्या अर्थाने संस्मरणीय आहे.
(क्रमश:)

