मुंबई/श्रीरामपूर प्रतिनिधी -
गेल्या चार महिन्यापासून शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने माय-लेकींचे संरक्षण व्हावे व लव्ह जिहाद संदर्भात जनजागृती व्हावी म्हणून बिगरराजकीय पद्धतीने भवानी रक्षा मोहीम चालू आहे. या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमध्ये शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमांना माता-भगिनींसह हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
या भवानी रक्षा मोहिमेंतर्गतच जनजागृती कार्य झाल्यानंतर आता लव्ह जिहादच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने कायदा पारित करावा या मुख्य मागणी करीता बुधवार दि.०५ जुलै २०२३ पासून शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने माजी पोलीस अधिकारी सुरजभाई आगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. तसेच या धरणे/ठिय्या आंदोलनात सरकारकडे छत्रपती संभाजीनगर नामकरण निर्णयाची थांबलेली अंमलबजावणी सरकारने तत्काळ सुरू करावी, प्रभू श्रीरामांच्या नावाने वसलेले श्रीरामपूर सरकारने मेरीटवर/गुणवत्तेवर श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा, श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य शिवस्मारकास शासनाने मंजुरी द्यावी तसेच अहिल्यादेवी जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ‘अहिल्यानगर’ घोषणेची अंमलबजावणी करावी आणि देशभक्त आरआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरील गुन्हा मागे घेण्यात यावा या मागण्या करण्यात आलेल्या आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने शिवप्रहार प्रतिष्ठान व इतर सहकारी संघटनांच्या वरील मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम चालू आहे.

