shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्व.प्रा.डॉ. ज्ञानेश्वर घोटेकर यांचे 'गंगथडी' आत्मचरित्र कृतज्ञतेचे अमृतमंथन =डॉ. राजीव शिंदे


श्रीरामपूर प्रतिनिधी:
आत्मचरित्र म्हणजे जीवनानुभावनांचे व्यक्ती व प्रसंगदर्शन असते.स्व.प्रा.डॉ.  ज्ञानेश्वर बाजीराव घोटेकर यांचे ' गंगथडी 'हॆ आत्मचरित्र म्हणजे त्यांना जीवनात भेटलेल्या आदर्श व्यक्ती आणि पुण्यभूमीबद्दलचे कृतज्ञतेचे सकारात्मक,आनंदमय जीवनाचे अमृतमंथन होय,असे मत रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ.राजीव रावसाहेब शिंदे यांनी व्यक्त केले. 


     श्रीरामपूर येथील अग्रवाल मंगलकार्यालयात आयोजित स्व.प्रा.डॉ.ज्ञानेश्वर घोटेकर लिखित ' गंग्थडी' आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष म्हणून डॉ. राजीव शिंदे बोलत होते. प्रारंभी स्व. डॉ. ज्ञानेश्वर घोटेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.संदीप ज्ञानेश्वर घोटेकर यांनी स्वागत केले.प्रस्तावनाकार डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला.प्रमुख पाहुणे म्हणून ऍड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके,मोखाडा येथील प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव भोर, गणेश अशोकराव बनकर पाटील, आनंदराव बाजीराव घोटेकर हे उपस्थित होते.प्रा.डॉ. बबनराव आदिक, प्रा. डॉ. बबनराव सहाणे, महादेव भिलारे, साई संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, कवी सागर, सौ. भाग्यश्री निलेश घोटेकर, दत्तात्रय बोरुडे, येळवंडे अण्णा आदिंनी मनोगत व्यक्त केले.


      प्राचार्य शेळके यांनी एक संस्कारशील आणि ज्ञानशील प्राध्यापक म्हणून डॉ. ज्ञानेश्वर घोटेकर विद्यार्थीप्रिय होते.ऍड. रावसाहेब शिंदे यांच्याशी त्यांचा विशेष घनिष्ट संबंध होता.आई, वडील, सासरे आणि ऍड. रावसाहेब शिंदे यांना हे पुस्तक अर्पण केले, यावरून हॆ संबंध कळतात. प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव भोर म्हणाले, डॉ. ज्ञानेश्वर घोटेकर यांना सर्वजण माऊली म्हणत, इतके त्यांचे मन आणि वागणे मृदू, आपुलकीचे होते.डॉ. राजीव शिंदे अध्यक्षीय भाषणात पुढे म्हणाले,स्व.डॉ. ज्ञानेश्वर घोटेकर यांचे आत्मचरित्राचे अपुरे स्वप्न घोटेकर परिवाराने पूर्ण केले.त्यांची पत्नी उषाताई घोटेकर,मुले संदीप व सागर घोटेकर, सुना सौ. प्रतिभा आणि सौ. श्वेताताई यांनी विशेष प्रयत्न केले. आयुष्य भरभरून कसे जगावे,एका शेतकरी पुत्राने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन रयत शिक्षण संस्थेत वाणिज्य शाखेत वरिष्ठ प्राध्यापक  १९८६ ते २०१९ या काळात रयतनिष्ठ म्हणून प्रभाव निर्माण केला,हे पुस्तक म्हणजे नदीच्या ओलव्यासारखा आहे. गावजिव्हाळा आणि ज्ञानतपस्वी व्यक्तिमत्वाचे हॆ श्रीमंत अंतरंग निर्मळपणे उघड करणारे लेखन असल्याचे सांगितले.डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ. बबनराव आदिक, सौ. नीलिमा नितीन आंबरे, आसरा प्रकाशनाच्या सौ. मोहिनी काळे,रचनाकार डॉ. शिवाजी काळे अशा अनेकांच्या सहकार्यातून हा आत्मचरित्राचा शब्दप्रवास गुणवत्तापूर्ण झाला आहे, प्रकाशन सोहळ्यास आलेल्या सर्वांना हॆ पुस्तक मिळाल्यामुळे त्याचे वाचन करून त्यातील कुटुंबप्रेम, शिक्षणप्रेम, माणुसकीचा गहिवर समजून घ्यावा असे आवाहन डॉ. राजीव शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. श्वेता सागर घोटेकर व सौ.कविताताई घोटेकर यांनी केले तर अरुणदादा घोटेकर यांनी आभार मानले.

*पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close