shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रत्येकामध्ये वाचन संस्कृती रुजवत आपली भाषा व विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावेत - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
आजच्या आधुनिकतेच्या युगात जागतिकीकरण अत्यंत वेगाने होत आहे. इंटरनेटच्या माध्यमातुन संपुर्ण जग अगदी हातामध्ये आले असले तरी ऊर्जा, शक्ती, विचार देण्याची ताकद पुस्तकांमध्येच आहे. प्रत्येकामध्ये वाचन संस्कृती रुजवत आपली भाषा व विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम या पंधरवड्यातून व्हावे,अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते.

 व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, तहसिलदार शिल्पा पाटील,  शिक्षणाधिकारी श्री. कडूस, डॉ. संजय कळमकर, डॉ.संजय गोरडे,  गणेश मरकड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, दैनंदिन जीवनामध्ये आपण मराठी भाषेचा वापर करत असतानासुद्धा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पंधरवडा साजरा करावा लागत आहे. या विषयावर गांभिर्याने विचार होणे गरजेचे आहे.जीवनाला दिशा देण्याची ताकद पुस्तकांमध्ये आहे.  येणाऱ्या काळात भाषा संवर्धनाची जबाबदारी पुढच्या पिढीवर असल्याने पुढच्या पिढीमध्ये वाचनसंस्कृती रूजविण्याची गरज असल्याचेही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यावेळी म्हणाले.

 पुस्तके प्रत्येक घरात तसेच मुलांपर्यंत पोहोचली पाहिजेत. यासाठी मोबाईल लायब्ररीसारखा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज असुन प्रत्येक शाळा, महाविद्यालयात वाचन कक्ष सुरु करण्यात यावेत. विरंगुळ्याच्या ठिकाणी पुस्तके पोहोचली पाहिजेत. सर्व आव्हाने पेलत मराठी भाषेचे संवर्धन, जतन व विकास होण्यासाठी केवळ पंधरवडा न साजरा करता ही एक लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी व्यक्त केली.
उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ म्हणाल्या की, मराठी भाषा संवर्धनासाठी वाचनाचा छंद जोपासणे गरजेचे आहे. साहित्यातूनच मराठी भाषा जोपासली जावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
साहित्यिक डॉ. संजय गोरडे म्हणाले की, आपले जीवन दु:खमुक्त केवळ ज्ञानानेच होऊ शकते. आपल्याला ज्ञान देऊन समृद्ध करण्याची ताकद केवळ ग्रंथांमध्ये आहे.  जीवनातील विरोधाभास दूर करण्याचे सामर्थ्य ग्रंथांमध्ये आहे. जीवनाला एक योग्य दिशा देऊन जीवन  आनंदी बनविण्यासाठी प्रत्येकाने ग्रंथांना शरण जात वाचनाची सवय अंगिकारण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
साहित्यिक डॉ. संजय कळमकर म्हणाले की, मोबाईलच्या अतिवापरामुळे पुस्तके वाचण्याची सवय लोप पावत चालली आहे. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथवाचनाची सवय प्रत्येकाने अंगिकारण्याची गरज असुन सामर्थ्यावान आयुष्यासाठी प्रत्येकाने ग्रंथांशी मैत्री करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विविध पुस्तकांचा समावेश असलेल्या पुस्तकांचे प्रदर्शनही या ठिकाणी उभारण्यात आले होते. हे प्रदर्शन या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधुन घेत होते.
कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थीनींची मोठ्या संख्येन उपस्थिती होती. 

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close