shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त अशोक पॉलिटेक्निक,फार्मसीमध्ये युवा संवाद संपन्न


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
जगभरातील तरुणांच्या योगदानाचा आणि क्षमतेचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. त्यानिमित माजी आ.भानुदास मुरकुटे व शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक पॉलिटेक्निक व अशोक फार्मसी महाविद्यालयात युवा सवांद कार्यक्रम संपन्न झाला.

             यावेळी श्रीरामपूर उपजिल्हा रुग्णालयाचे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी लक्ष्मीकांत करपे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री.करपे यांनी सांगितले की, भारत देश युवकांचा देश आहे व युवा शक्ती देशाचा आधारस्तंभ आहे. आंतरराष्ट्रीय युवा दिन तरुणांना भेडसावणाऱ्या समस्या आणि आव्हाने याबद्दल जागरूकता वाढविण्याची तसेच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्याची संधी म्हणून कार्य करते. तरुणांच्या चिंता आणि आकांक्षांवर चर्चा करून त्यांचे निराकरण करण्यासाठी एकत्र येण्यासाठी व्यासपीठ प्रदान करावे. हा दिवस विविध वयोगटांमध्ये समजूतदारपणा आणि सहकार्य वाढविण्यासाठी आंतरसांस्कृतिक आणि आंतरजातीय संवादास प्रोत्साहित करतो. जगातील अनेक लोक आजपर्यंत विविध व्यसनांच्या आहारी गेले आहेत. आत्ताच्या काळात दारू, तंबाखू, सिगारेट, हुक्का, अमली पदार्थ याचे सेवन लहान वयातही होताना दिसत आहे आणि मोबाईलचा वापर ३ ते ८० वयोगट अशा मोठ्या पातळीवर घडताना दिसतोय. हे नक्कीच हानिकारक आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा ती गोष्ट घातक ठरायला कारणीभूत होऊ शकतो.  मोबाईल व्यक्तीला संपर्क ठेवायला उपयोगी साधन म्हणून वापरायला सुरुवात झाली आणि हळू हळू अद्ययावत होत गेलेल्या मोबाईलमध्ये कॅमेरा, व्हिडिओ, रेडिओ, इंटरनेट या सगळ्या गोष्टी आल्यामुळे हा 'अद्ययावत फोन' हातात आल्यावर त्याचा मोबाईल हे एक व्यसन जगाला व्यापून टाकत आहे. त्याचे होणारे परिणाम जाणवू लागल्यामुळे शालेय पातळीवर मुलांना मोबाईल वापरायला देऊ नये, असे नियम लागू केले आहेत. त्यांच्या अभ्यासानुसार विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर मोबाईल विघातक परिणाम घडवतो; तसेच शैक्षणिक प्रगतीत अडथळे निर्माण करतो, असे श्री. करपे यांनी सांगितले.
            पॉलिटेक्निकचे उपप्राचार्य अरुण कडू यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, तरुणाई म्हणजे जीवनाच्या नवनवीन शक्यता प्रती खुले असणे आहे. जर आपला तरुण वर्ग अधिक सजग झाला, तर मानवतेचे भविष्य उज्वल असेल. तारुण्य हा प्रचंड उर्जेचा स्त्रोत असतो. म्हणून तुम्ही भविष्याकडे लक्ष द्यायला हव, समस्यांकडे नको. युवा दिनानिमित्त संस्थेचे संस्थापक माजी आ.भानुदास मुरकुटे, अध्यक्ष कोंडीराम उंडे, उपाध्यक्ष योगेश विटनोर, सचिव सोपानराव राउत, रा.यु.काँ. चे माजी जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ मुरकुटे, कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे, प्राचार्य अंजाबापू शिंदे व सर्व संचालक मंडळ आदींनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पॉलिटेक्निकचे उपप्राचार्य अरुण कडू व फार्मसीचे प्राचार्य प्रसाद कोते यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी लक्ष्मीकांत करपे यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वैशाली सुकेकर यांनी केले.

*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
close