*लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या ११ व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !!
इंदापूर: *(दि.०३/०६/२०२५)*
भटक्या विमुक्तांसाठी सर्वस्व पणाला लावणारे,बहुजनांचे कैवारी, उत्तुंग व्यक्तिमत्व ,उपेक्षित व वंचित
घटकांचा वाली, ऊसतोड कामगार/ मजूर वर्गाचा तारणहार
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा जन्म १२ डिसेंबर १९४९ रोजी नाथरा ता. परळी वैजनाथ जि. बीड या ठिकाणी झाला.
ऊसतोड कामगाराचा मुलगा, जिल्हा परिषद सदस्य, ऊसतोड कामगारांचा नेता, आमदार, विरोधीपक्ष नेता, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री,कारखान्याचा मालक, साखर व सहकार सम्राट,खासदार ,लोकसभा उपनेता अशी त्यांची प्रदीर्घ कारकीर्द सतत प्रेरणा देणारी आहे. केंद्रियमंत्री म्हणून कारकीर्द मात्र अधुरीच राहिली.
शिक्षण ,सहकार, ऊर्जा, कृषी, कायदा व सुव्यवस्था, सामाजिक समरसता, विविध सामाजिक व राजकीय चळवळी व विविध क्षेत्रात मुंडे साहेबांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे.
भटके विमुक्त,ओबीसीतील उपेक्षित व वंचित घटकांना सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मुंडे साहेबांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, मात्र आम्हाला सत्तेत जाण्याचा मार्ग लोकनेते मुंडे साहेबांनी दाखविला.
भटके-विमुक्त ओबीसी मधील उपेक्षित व वंचित समाजाच्या विकासासाठीच्या योगदानाचा आवाका फार मोठा होता. ह्या समाजामध्ये अस्मितेचे आणि सत्तेचे स्फुल्लिंग साहेबांनी निर्माण केले. मुंडे साहेबांनी ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी लोकसभेत केली.मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी उभारलेल्या लढ्यात एक अग्रस्थानी नाव म्हणजे गोपीनाथराव मुंडे होय.
लोकनेते मुंडे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री झाल्यानंतर बहुजन समाजातील वंचित, शोषित, पीडित,कष्टकरी,मजूर, कामगार शेतकरी व भटक्या विमुक्त जाती- जमातीच्या अनेक प्रश्नांना व समस्यांना न्याय देण्याचे व त्या समस्या मार्गी लावण्याचे काम केले.ऊसतोड कामगार हा मोठ्या प्रमाणात भटक्या विमुक्त जाती जमातीतील असल्यामुळे साहेबांनी प्राधान्याने ह्या वर्गाकडे लक्ष दिले.
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड होऊ नये म्हणून मुंडे साहेबांनी वस्तीशाळा, पालावरची शाळा, साखर शाळा, आश्रमशाळा, वसतिगृहांना भरभरून सहकार्य केलं.
भटक्या विमुक्त समाजाला विकासाच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय प्रवाहात आणण्याच्या प्रक्रियेचे लोकनेते मुंडे साहेब हे आद्य प्रवर्तक व प्रणेते होत. संत भगवान बाबा हे साहेबांचे श्रद्धास्थान होते. साहेब दर दसरा मेळाव्याला भगवान गडावर यायचे बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आलेल्या लोकांना संबोधित करायचे.भाषणातून उपस्थितांना ऊर्जा मिळायची. साहेब शेवटच्या श्वासापर्यंत दसरा मेळाव्याला भगवान गडावर येत असत.
मोडेन पण वाकणार नाही आणि आयुष्यात कधी कुणापुढे झुकणार नाही.हे ब्रीद आम्हाला आभाळा एवढा स्वाभिमान देऊन गेलं .
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या ११व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !!
💐💐🙏🙏
- अभिवादक -
श्री.नानासाहेब सानप,इंदापूर जि. पुणे.