एरंडोल शहर संघर्ष समितीचे प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन.
प्रतिनिधी | एरंडोल
एरंडोल शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एरंडोल शहर संघर्ष समिती च्या वतीने आज दिनांक २१ जुलै २०२५ रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्यात आले.
शहरातील रस्ते, गटारी, जलयोजना, स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षिततेशी संबंधित तब्बल १० प्रमुख मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले आहे. संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर करत तातडीने कारवाईची मागणी केली.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या :
1. शहरातील रस्ते खड्डेमुक्त व चिखलमुक्त करावेत.
2. गटारी, स्वच्छतागृहे व स्मशानभूमीची नियमित साफसफाई व्हावी.
3.विपश्यना केंद्र स्वच्छ करून कर्मचारी नियुक्त करावेत.
4. अमृत जल योजना तातडीने पूर्ण व्हावी.
5. भूमिगत गटारी व नवीन वसाहतींतील मूलभूत सुविधा तत्काळ पुरवाव्यात.
6. शुद्ध पिण्याच्या पाण्याचा योग्य पुरवठा करावा.
7.नागरिकांच्या आरोग्यासाठी औषध फवारणी नियमित व्हावी.
8. आठवडे बाजार नियोजित जागेवर भरवावा.
9. ओपन स्पेस सुशोभीकरण व स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात यावी.
10. पथदिवे दुरुस्त करून नियमित सुरू ठेवावेत.
शहरवासीयांच्या समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, वेळोवेळी मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा संघर्ष समितीचा आरोप आहे.
"लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्यात आला नाही, तर हे आंदोलन तीव्र केले जाईल," असा इशाराही समितीने दिला आहे.
यावेळी शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष रविंद्र लाळगे, अरूण माळी, उपाध्यक्ष नामदेव पाटील. आर. झेड. पाटील. डॉ. दिनकर पाटील, प्रा. शिवाजीराव अहिरराव, पी. डी. पाटील, पी.जी.चौधरी, पत्रकार प्रवीण महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.


