शिर्डी-वणी पदयात्रेचा ४१ वर्षांचा वारसा; गजू अण्णा शेर्वेकर आणि विराटजी पुरोहित यांच्या हस्ते होणार पूजन
शिर्डीची पहिली मानाची पालखी शुक्रवारी सप्तशृंगी गडाकडे रवाना; ४१ वर्षांच्या अखंड परंपरेचा जल्लोष
शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
गेल्या ४१ वर्षांची देदीप्यमान आणि अखंड परंपरा असलेल्या शिर्डी गावातील पहिल्या मानाच्या पालखी सोहळ्याचे आणि पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री साईबाबा सेवा संस्थान शिर्डी संचलित, ‘श्री साईलीला पदयात्रा समिती’च्या वतीने आयोजित श्री क्षेत्र शिर्डी (साईबाबा) ते श्री क्षेत्र वणी (सप्तशृंगी देवी गड) या भव्य पदयात्रा सोहळ्याला शुक्रवार, दि. ०९ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात प्रारंभ होत आहे.
शिर्डी ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आणि एकतेचे प्रतीक असलेल्या या पदयात्रेचे हे ४१ वे वर्ष आहे. या सोहळ्याचे प्रस्थान शुक्रवारी सकाळी चावडी मंदिर येथून होणार आहे. तत्पूर्वी, सकाळी १० वाजता सन्मित्र युवक मंडळ शिर्डीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक मा. श्री. गजू अण्णा शेर्वेकर आणि मा. श्री. विराटजी बाबू पुरोहित यांच्या शुभहस्ते पालखीचे विधिवत पूजन आणि महाआरती संपन्न होईल.
या पाच दिवसीय पदयात्रा सोहळ्याचा कालावधी ०९ जानेवारी २०२६ ते १३ जानेवारी २०२६ असा असणार आहे. पहिल्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी सकाळी ११ वाजता चावडी मंदिर येथून पालखीचे आणि पदयात्रींचे हरिनामाच्या गजरात वणी गडाकडे प्रस्थान होईल.
साईबाबांच्या भक्तीचा आणि आदिमायेच्या शक्तीचा संगम साधणाऱ्या या पदयात्रेत शिर्डी व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री साईलीला पदयात्रा सोहळा समितीचे श्री. गणेश सिद्धेश्वर वाघचौरे यांनी केले आहे. शिर्डीतून निघणाऱ्या या पहिल्या मानाच्या पालखीमुळे शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

