- राज्यात दररोज 10 लाख लिटर दूधाची खरेदी.
- 25 रुपये दराने करणार; शेतकऱ्यांना दिलासा.
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती सरकारचे हार्दिक आभार - आप्पासाहेब ढुस
मुंबई, दि. 31 :-
‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज दहा लाख लिटर दूधाची 25 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करेल. येत्या चार-पाच दिवसात हे संकलन सुरु होईल आणि ‘कोरोना’चा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी सुरु राहील, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला.
‘कोरोना’ प्रादुर्भावामुळे राज्यातील दूधव्यवसाय, दुधउत्पादक शेतकरी संकटात आहे. दूधविक्री घटल्यामुळे गावागावात दूध स्विकारले जात नाही. राज्यात उत्पादित 12 लाख लिटर दुधापैकी 10 हजार दूध अतिरिक्त ठरत आहे. खाजगी बाजारात दूधाचा दर 15 ते 17 रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली घसरला आहे. शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब दुधउत्पादकांना याचा फटका बसत आहे. या शेतकऱ्यांना दिलासा, आधार देण्यासाठी तसेच कोरोना’च्या धक्क्यातून सावरण्यासाठी राज्यात अतिरिक्त ठरत असलेले 10 लाख लिटर दूध दूध संस्थांच्या माध्यमातून शासन 25 रुपये प्रतिलिटर दराने खेरदी करेल. त्या दुधाची भूकटी करुन ती साठवली जाईल, नंतर त्याची ऑनलाईन विक्री केली जाईल, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. राज्य दूध महासंघाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार असून यातून शेतकऱ्यांना आधार व दिलासा मिळेल. यासाठी साधारणपणे 200 कोटी रुपये निधी लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, दुग्धविकासमंत्री सुनील केदार (दूरध्वनीद्वारे), वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह वरिष्ठ अधिकारी व दुध महासंघाचे व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
देवळाली प्रवरा येथील शेतकरी तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी दि. २९ रोजी रात्री ०८.२० वाजता मुख्यमंत्री ना. श्री उद्धवजी ठाकरे यांना ई मेल द्वारे दूध उत्पादक शेतकरी च्या समस्या बाबद अवगत केले होते. मुख्यमंत्री कार्यालयाकडून केवळ दहाच मिनिटात मेल द्वारे योग्य त्या कार्यवाही साठी मेल पुढे पाठविल्याचे सांगून हे सरकार शेतकर्यांबाबद संवेदनसील असल्याचे दाखवून दिले होते. सरकारच्या या निर्णयाचे आप्पासाहेब ढुस यांनी स्वागत केले असून कृषी सेवा केंद्रां प्रमाणे दुध प्रश्नावर तात्काळ निर्णय दिला त्या बद्दल समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने सरकारचे हार्दिक आभार व्यक्त केले आहे.


