आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू; घाबरून जाऊ नका, काळजी घेण्यासाठी उचलली पाऊले-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई- |वृत्तसेवा |
कोरोनाशी मुकाबला करताना आपण आता अधिक खंबीर पावले टाकत आहोत. हा रोग समाजात पसरण्याच्या आत रोखणे महत्वाचे आहे, सर्वात कठीण काळ आता सुरु झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याला संबोधून केलेल्या लाईव्ह प्रसारणात केली. मात्र यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता निश्चय, संयमाने शासनाच्या बरोबरीने याचा मुकाबला करावा, असेही मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी सांगितले आहे.
रेल्वे मंत्रालयाने आज देशभरातील रेल्वे व उपनगरीय सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमांतून लगेचच राज्यातील जनतेशी संवाद साधला व राज्य शासन पुढील परिस्थिती हाताळण्यास खंबीर आहे, याची ग्वाही दिली.


