सासवड : "कृषी समृद्धीतून कोकणचा शाश्वत विकास "या कृषी शास्त्रज्ञ डॉ. उत्तम विश्राम महाडकर निर्मित पुस्तकाची उत्कृष्ट साहित्य पुरस्कारासाठी निवड झाल्याने त्यांना पुणे जिल्ह्याच्या सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात संपन्न झालेल्या ११ व्या राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक तसेच राष्ट्रीय सरचिटणीस दशरथ यादव व संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व जगतगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेद्वारा या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे,द्वारकामाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आत्माराम कामते, सासवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष शिवाजीराव कोलते, राज्य कार्याध्यक्ष गंगाराम जाधव ,जिल्हाध्यक्ष राजाभाऊ जगताप व जिल्हा चिटणीस सुनील धिवार इ. मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
सामाजिक कार्याची आवड असणारे डॉ. महाडकर हे सध्या कृषी महाविद्यालय ,दापोली येथे सहयोगी अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत.शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याचा त्यांना ३२ वर्षांचा अनुभव असून १० वर्षे त्यांनी ' कृषिविद्या विभाग प्रमुख ' व साडे चार वर्षे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे ' ' संशोधन संचालक ' म्हणून कार्य केले आहे.त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून ८६ शास्त्रीय,२२५ तांत्रिक,५१ वर्तमानपत्रीय लेख,१३ घडीपत्रिका व १४ पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत.तसेच ३४ एम. एस्सी. आणि ९ पीएच. डी.(कृषी)च्या विद्यार्थ्यांचे ' संशोधन मार्गदर्शक ' म्हणून कार्य केले आहे.पुरस्कारप्राप्त सदर पुस्तकाचे डॉ. महानंद माने हे सहलेखक आहेत.डॉ महाडकर यांच्या या स्पृहणीय यशाबद्दल त्यांचे समाजाच्या विविध थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

