सावळीविहीर। राजकुमार गडकरी।
सध्या कोरोनामुळे देशात व राज्यात हाहाकार उडाला असून सर्वत्र लॉकडाऊन आहे, सर्व काम-धंदा बंद आहे. त्यामुळे सर्वत्र आर्थिक चणचण निर्माण झाली आहे असे असताना वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांकडून वीज बिले वसूल करणे थांबवावे तसेच सक्तीने वीज बिल वसूल करू नये व रोहित्र जळाले तर त्वरित त्याठिकाणी नवीन रोहित्र बसवावे, बंद रोहित्रा मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची सध्याच्या परिस्थितीत वीज वितरण कंपनीने व शासनाने काळजी घ्यावी. तसे शासनाने वीज वितरण कंपनीला आदेश द्यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी होती. या मागणीच्या नुसार राज्याचे माजी विरोधी नेते व माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नामदार नितीन राऊत यांच्याकडे दूरध्वनीद्वारे संपर्क करून हा प्रश्न मांडला व नामदार नितीन राऊत यांनीही त्वरित याची दखल घेत वीज वितरण कंपनीला तसे निर्देश दिले.
सध्या कोरोना मुळे सर्वत्र बंद आहे, इथून मागे शेतीचीही कामे ठप्प होते मात्र नुकतीच या लॉकडाऊन काळात शेती कामे करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांनी लॉकडाऊन चे नियम पाळत सवलत दिली आहे, सध्या उन्हाळा सुरू झाल्याने उन्हाचा कडाका वाढला आहे, सध्या शेतीचे कामे ग्रामीण भागात जोर धरत आहेत, मात्र शेतीत पाणी भरण्यासाठी विजेची मोठी गरज असते ,मात्र अनेक ठिकाणी रोहित्र जळणे विजेचा सुरळीत पुरवठा न होणे असे प्रकार घडत आहेत. एकदा रोहित्र जळाल्या नंतर ते लवकर बदलून मिळत नाही,शिवाय लॉकडाऊन काळात वीज वितरण कंपनीकडे चकरा मारणे किंवा रोहित्र बसवण्यासाठी मागणी करणेही शेतकऱ्यांना अवघड होऊन बसले आहे, जर एखाद्या ठिकाणी रोहित्र जळाले तर त्यामुळे त्या परिसरातील शेतकर्यांना पिकांना पाणी देता येत नाही व पिके जळण्याच्या मार्गावर येतात तेव्हा या आपत्ती काळात जर एखाद्या ठिकाणी रोहित्र खराब झाला तर तो त्वरित वीज वितरण कंपनीने बदलावा, त्यासाठी विलंब करू नये, त्याचप्रमाणे सध्या आर्थिक अडचणीच्या काळात सुद्धा वीज वितरण कंपनीकडून वीज बिल वसुली जोरात सुरू आहे, सध्या राज्यातील शेतकरी किंवा या भागातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे, पिके शेतात उभी आहेत व ते जळण्याच्या मार्गावर आहेत, मार्केट बंद आहे, आर्थिक कमाई बंद आहे, अशा परिस्थितीत वीज वसुली करणे योग्य नाही.
त्यामुळे या आपत्कालीन स्थितीत वीज बिल वसुली शेतकऱ्यांकडून करू नये अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक त्वरित थांबवणे गरजेचे आहे.वीज बील भरण्याची अट शिथील करुन जळालेले रोहीत्र तातडीने बदलून दिले जावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती या शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ऊर्जामंत्री नामदार नितीन राऊत यांच्याकडे दूरध्वनीद्वारे संपर्क साधून ग्रामीण भागात कोरोना मुळे उद्भवलेल्या परिस्थिती मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना विज बिल वसुली ची सक्ती करू नये, तसेच जर रोहित्र बंद पडले तर ते त्वरित बदलून द्यावे, विजेचे भारनियमन कमी करून पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना सोयीचे जावे म्हणून वीज पुरवठा सुरळीत व्हावा असे सांगितले व आमदार राऊत यांनी ही करीत वीज वितरण कंपनीला तसे निर्देश दिले त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे,


