shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

…तरी देवा सर ना ह्यो भोग कशापायी!

हरवली वाट दिशा अंधारल्या दाही…
कुठला रस्ता… कुठली वळणं…कुठला हा अंधार!

हा पायी प्रवास सुरु झालाय अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीपासून…
आणि हा प्रवास थांबणार आहे वाशिम जिल्ह्यातील मंगरूळ तालुक्यात!
वाशिम जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक कुटुंब शेतीच्या कामासाठी शेतमजूर म्हणून येथे येतात.
शेतीतील सर्व प्रकारची कामे प्रामाणिकपणे- इमानइतबारे करत असतात. एक स्त्री आणि एक पुरुष अशा एका जोडीचे शेतमजूर म्हणून 500 रुपये या दराने ते रोजंदारीचे काम करतात.त्यांची जेवणाची व्यवस्था शेतीमालक करत असतो.



संपूर्ण विश्वात कोरोनाव्हायरसने थैमान घातले आहे. त्याचा फटका बाहेरगावाहून आलेल्या शेतमजुरांनाही बसला.महाराष्ट्र लॉकडाऊन झाला.१४ एप्रिलला काही तरी निर्णय होईल याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.मात्र लॉकडाऊन पुन्हा ३ मे पर्यंत वाढविण्यात आला. पुढचा भविष्यातला अंधार अनेक गरीब कुटुंबांना दिसू लागला.

त्यातील वाशीमचे मंगरूळ तालुक्यातील शेतमजूर हेही आपल्या भविष्याकडे लक्ष देऊन बेलवंडी सोडून आता गावाकडे निघालेत! दोन दिवसांचा टप्पा गाठत मजल-दरमजल करत ते अहमदनगर शहरात पोहोचले आहेत.खांद्यावरती -डोक्यावरती तुटपुंजा संसार घेऊन ते अशा ३८ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या उन्हाळ्यात शरिर जाळत जगण्याचा संघर्ष करत आहेत. रस्ता विचारत विचारत त्यांचा प्रवास सध्या सुरू आहे.रस्त्याने अनेकांनी जेवणाची – पाणी पिण्याची व्यवस्था केल्याचे ते सांगतात ही एकच बाब समाधानकारक आहे.

रस्त्याने जाणा-या एका महिला भगिनीने या कुटुंबांची आस्थेने चौकशी केली आणि आपल्या गाडीच्या डिक्कीतील चटणी आणि भाकरी तुम्हाला दिली तर चालेल का ? असं विचारून त्यांच्या हातात डबा दिला.
माणुसकी अजूनही जिवंत आहे.ही गोष्ट मनाला समाधान देणारी असली तरी त्यांचा हा संघर्ष माणूसकीप्रिय माणूस पाहू शकत नाही आणि जरी पाहिला तरी तो निशब्द होऊन असाच पुढे जातो आणि मनातल्या मनात म्हणतो,
“मला यांच्यासाठी काहीच करता आले नाही!”

✍️शाम मुरलीधर कांबळे
close