अहमदनगर दि.02- महाराष्ट्र शासनाने कोरोना प्रार्दूर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू करण्यात आली असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सध्या ई-पॉस मशिनवर कार्यरत असलेल्या प्राधान्य कुटूंब लाभार्थी आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना माहे एप्रिल 2020 पासून नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रती सदस्य प्रतिमाह पाच किलो तांदूळ मोफत वितरण करण्याबाबत आदेश दिले आहेत
माहे मे व जून 2020 साठी देखील ही योजना कार्यरत राहणार आहे. प्रत्येक महिन्यांत प्राधान्य कुटूंब योजने अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी गहू 3 किलो व तांदूळ 2 किलो तसेच अंत्योदय योजने अंतर्गत प्रतिकार्ड गहू 26 किलो व तांदूळ 9 किलो असे मासिक परिमाण ठरविण्यात आले आहेत. या दोन्ही योजनेसाठी दर गहू 2 रुपये व तांदूळ 3 रुपये किलो असा आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक लाभार्थ्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत 5 किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे.
नियमित व मोफत धान्य वाटप करतांना ईपॉसद्वारे मिळालेली पावती ग्राहकाला देणे अनिवार्य असल्याच्या सूचना अलहिदा रास्तभाव दुकानदार यांना दिलेल्या आहेत. संबंधीत लाभार्थ्यांनी कोविड- 19 प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर रास्तभाव दुकानामध्ये गर्दी न करता प्रत्येक ग्राहकांच्या मध्ये 1 मीटर अंतर ठेवून तोंडाला मास्क लावून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येवून धान्याची उचल करावी, असे जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


