अहमदनगर दि.09 -
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये मोठ्याप्रमाणात मोलमजुरी करणाऱ्या मजुरांचे स्थलांतर होत आहे. रोजगाराची सोय नसल्याने हे मजूर आपल्या मूळगावी घराकडे परत आहेत. अशातच पर जिल्ह्यातून अहमदनगर शहरातून पायी जाणाऱ्या मजुरांची नगर तहसील प्रशासनाने दखल घेत या मजुरांना राहण्या-खाण्याची, स्वच्छता निर्जंतुकीकरण, आवश्यक आरोग्य तपासणी आदी व्यवस्था उपलब्ध करून दिली
नगर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी उमेश पाटील यांना पर जिल्हयातील मजुरांची माहिती मिळताच त्यांनी सकारात्मक पाऊल उचलत या मजुरांविषयी सहानुभूती दर्शविली. प्रशासनाच्या वतीने या मजुरांना दिल्लीगेटजवळील दादासाहेब रुपवते विद्यालय येथे निवास व्यवस्था करण्यात आली असून त्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात येणार आहे. त्यांना साई द्वारका सेवा ट्रस्टच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. चार महिला व चार पुरुष असे एकूण आठ मजूर अहमदनगर शहरातून जात असतांना नगर तहसील प्रशासनाच्या फ्लाइंग स्कॉडला ते निदर्शनास आले.
नायब तहसीलदार माधव गायकवाड, जगन्नाथ ढसाळ मंडलाधिकारी-सावेडी, हरिष देशपांडे-तलाठी, अविनाश चीटमील, सुनील भवर, अविनाश परळकर, अमोल बागुल तसेच साई द्वारका सेवा संस्थेचे धनंजय जाधव यांनी विशेष परिश्रम घेत आहेत.


