लग्नानंतर 15 दिवसातच नववधू प्रियकरासोबत पसार, दीड लाखांच्या दागिन्यांसह पोबारा
शिर्डी प्रतिनिधी:
लग्नानंतर अवघ्या 15 दिवसातच नववधूने प्रियकरासोबत धूम ठोकल्याची घटना समोर आली आहे. तरुणीने सासरच्या घरातील दीड लाखांचे दागिने घेऊन पोबारा केला. अहमदनगरमध्ये घडलेल्या या प्रकाराने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदामध्ये लग्न करुन आलेली बारामतीची तरुणी दोन आठवड्यातच पळून गेली. घरातील एक लाख 55 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन ती पसार झाली.
या प्रकरणी पहिल्या पतीने दिलेल्या तक्रारीवरुन पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित तरुणी प्रियकरासोबत आळंदीला पळाली असून तिथे जाऊन त्या दोघांनी लग्न केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.बारामती तालुक्यातील तरुणीचा विवाह 25 जूनला श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथे राहणाऱ्या युवकाशी झाला होता. लग्नापूर्वीच तिचे तरडोली गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे बोलले जाते. त्यानंतर 11 जुलैला पतीच्या घरातून जवळपास दीड लाख रुपये किंमतीचे दागिने घेऊन पसार झाली.
दरम्यान, लग्नानंतर नवऱ्यासोबत देवदर्शनाला गेल्यानंतर नवविवाहिता चक्क प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना वर्षभरापूर्वी अहमदनगरमध्येच समोर आली होती. देवदर्शन आटोपल्यानंतर पती गाडी पार्किंगमधून काढण्यासाठी गेला. तिथे आधीच आलेल्या नवरीच्या प्रियकराने ही संधी साधली. त्याने आपल्या विवाहित प्रेयसीला बाईकवर बसवून धूम ठोकली होती.

