मावळ:- मावळातील पवना धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत धरण क्षेत्रात 39 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात 2.64 टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण साठा 58.83 टक्के झाला आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागल्याने शहरवासीयांना अधिकच्या पाणी कपातीपासून दिलासा मिळाला आहे.
पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान पवना धरणातून भागविली जाते. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारीमुळे पालिकेने डिसेंबर 2019 पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे.
मागील नऊ महिन्यापासून शहरवासीयांना एकदिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यातच पावसाळ्यातील जुन, जुलै दोन महिने पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे शहरवासीयांवरील पाण्याचे संकट अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात होती.
पण, ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे. त्यामुळे साठ्यात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
गेल्या 24 तासांत धरण क्षेत्रात 39 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 2.64 टक्क्यांनी वाढ झाली असून 1 जूनपासून 951 मिमी पाऊस धरण क्षेत्रात झाला आहे. पाणीसाठ्यात 23.54 टक्के वाढ झाली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 95.80 टक्के होता. तर, 3099 मिली मीटर पाऊस धरण क्षेत्रात झाला होता. त्या तुलनेत यंदा पाऊस कमी पडला आहे.


