कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करा - छगन भुजबळ
शिर्डी एक्सप्रेस
नासिक विभाग प्रतिनिधि : ता.23-8-2020
कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या कारणांचा सखोल अभ्यास करून मृत्युदर रोखण्यासाठी अधिक उपाययोजना करण्यात याव्यात असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज येवला शासकीय विश्रामगृह येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार किशोर दराडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल पाटील, निफाडच्या प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार रोहिदास वारुळे, निफाडचे तहसीलदार दिपक पाटील, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर,सार्वजनिक बांधकाम विभागावर उपअभियंता देवरे, महावितरणचे कार्यकारी राजाराम अभियंता, उपअभियंता प्रजापती, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी,वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एच.आर. गायकवाड,गटविकास अधिकारी डॉ.उमेश देशमुख,संदीप कराड, सहायक निबंधक एकनाथ पाटील, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी, लासलगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे तालुका अध्यक्ष साहेबराव मढवई,मोहन शेलार, राष्ट्रवादी येवला शहर अध्यक्ष दिपक लोणारी, शहर उपाध्यक्ष गोटू मांजरे,विनोद पाटिल ,सुनील पैठकर ,सुमीत थोरात, सामाजिक न्याय विभाग येवला शहर अध्यक्ष सुभाष गांगुर्डे आदी उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली असतांना पुन्हा नव्याने रुग्ण वाढळत आहे हा चिंतेचा विषय असून रुग्णसंख्या वाढणार नाही यासाठी शहर व तालुक्यात पुन्हा सर्व्हे करण्यात येऊन कोमॉर्बीड रुग्णांचा नव्याने शोध घेऊन औषधे उपलब्ध करून देण्यात यावी. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेडची संख्या कमी पडणार नाही यासाठी अधिक बेडची व्यवस्था करण्यात यावी त्यादृष्टीने येवला उपजिल्हा रुग्णालयाचे तातडीने काम करण्यात यावे असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.
ते म्हणाले की, कोरोनाच्या उपचारासाठी नाशिकला उपचारासाठी पाठविण्यात आलेल्या रुग्णांची नियमित माहिती संकलित करण्यात यावी. रुग्णांच्या इतर आजारांबाबत अधिक माहिती ठेऊन त्यावर लवकरात लवकर उपचार करण्यात यावा अश्या सूचना देण्यात आल्या. तसेच नागरिकांनी चौकशीसाठी आलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्यात यावे असे आवाहन केले. तसेच तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था बघता रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येऊन खड्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा असेही त्यांनी सांगितले यावेळी शेतकरी कर्जमाफी, पीक कर्ज, गणेशोत्सव याबाबत आढावा घेतला..!!

