गडचिरोली :- देशात सतत वाढत चाललेल्या कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका असतानाही केंद्र सरकारने जेईई-नीट परिक्षा घेण्याचे ठरविले आहे. परिक्षा काळात विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने सरकारने जेईई-नीट परिक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे.
जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज अतिरिक्त जिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांची भेट घेऊन निवेदन दिले.दिवसेनदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे.त्यात केंद्र सरकार जेईई आणि नीट परीक्षा घेणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत पालक चिंताग्रस्त आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही परिक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी काँग्रेस कमिटीने केली.
शिष्टमंडळात काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, जिल्हा कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, जिल्हा महासचिव एजाज शेख, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, एनएसयुआयचे महासचिव गौरव येनप्रडडीवार उपस्थित होते.
युवक काँग्रेसचे प्रदेश चिटणीस अतुल मल्लेवार आणि जिल्हा महासचिव कुणाल पेंदोरकर यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज तहसीलदारांना निवेदन देऊन दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली.

