shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गडचिरोली : आदिवासी नक्षलग्रस्त भागात पहिला पुल कम बंधारा लोकार्पित....!!

गडचिरोली ता.६:- आदिवासी नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली भागात आजही दळणवळणाच्या समस्या आ वासून उभ्या आहेत. त्या दूर करण्यासाठी बारमाही पाणी असलेल्या नाल्यावर पुलाची निर्मिती केली जात आहे. मात्र केवळ पुल न उभारता सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याला बंधारे वजा पुल अशी संकल्पना राबविल्याने रस्ते व सिंचन या दोन्ही क्षेत्रात लाभ होत आहे.  याप्रकारचा पहिला पुल नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यातील करेमरका गावात लोकार्पित करण्यात आला
.

जिल्ह्याला भरभरून वनसंपदा लाभली आहे. मात्र निसर्गाच्या वरदानासह नक्षल चळवळीची काळी किनार जिल्ह्याला लागली आहे. नक्षल चळवळ नियंत्रणात आणण्यासाठी बारमाही पाणी असलेल्या नदी , नाल्यावर पुलाची निर्मिती करून बारमाही रस्ते संपर्क स्थापित करण्याच्यादृष्टीने प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील नक्षलग्रस्त अशा छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असणाऱ्या धानोरा तालुक्यातील करेमरका या गावाजवळ एक स्थानिक नाला वर्षातील सहा महिने संपर्कात अडचण ठरत होता.

 त्यामुळे परिसरातील तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटायचा. आरोग्य यंत्रणापुढे मोठी समस्या उभी राहायची. विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट करावी लागायची तर भर पावसाळ्यात तसं सगळंच ठप्प व्हायचं अशा येणाऱ्या अडचणी बघून स्थानिक नागरिकांनी अनेक वर्षापासून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यावर मार्ग म्हणून चार कोटींहून अधिक रुपये किंमतीच्या पुलांची निर्मिती सुरू केली. मात्र विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा केवळ पुल न राहाता बंधारेवजा पुल असावा अशी संकल्पना मांडली. त्यानुसार मागच्या वर्षी या पुलाच्या व बांधाऱ्याच्या कामाला सुरुवात झाली.

पुलाची निविदा खर्चापेक्षा कमी किमतीत स्वीकारली गेल्याने शासकीय निधीची बचत झाली. त्यातूनच हा सुंदर बंधारा साकारला गेला. बांधकाम विभागाने या भागात बारमाही रस्ते संपर्क स्थापित केलाच आहे. याशिवाय या भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी या प्रकल्पाने मदत मिळणार आहे. ३ कोटी ६५ लक्ष रुपयांचा पूल तर ४० लाख रुपयांचा बंधारा बांधून सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागातील नागरिकांची मोठी सोय केली आहे.

हा गडचिरोली जिल्ह्यातील पहिला असा बंधारेवजा पूल आहे. सुमारे दहा गावांना या पाण्याच्या सिंचनाचा लाभ होणार असून चार किलोमीटरपर्यंत पाणी सध्या साचले आहे. करेमरका-ढवळी -जपतलाई या गावांसह अनेक गावातील पाणी पातळी या प्रकल्पाने वाढणार आहे. याशिवाय रोजगार- शिक्षण -आरोग्य यासाठी या गावांमधून तालुका व जिल्हा स्थानी जाणाऱ्या नागरिकांना आता विनाअडसर जाता येणार आहे.

यामुळेच सिंचन -शेती व जीवनमान उंचावण्यास हा बंधारेवजा पूल लाभकारक ठरणार आहे. हा पुल आता पर्यटनासाठी महत्वाचा ठरत आहे. पुल पाहण्यासाठी लोकांची गर्दी ही सुरू झाली आहे. हा साधा पुल नसून हिरव्यागार घनदाट जंगलाने व्यापलेला परिसरात हा टू-इन-वन पुल प्लस बंधारा असल्याने नागरिक याकडे आकर्षित होत आहेत.

गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून ४८ किलोमीटर वर हा पुल-बंधारा आहे. त्यामुळे गडचिरोली शहरात राहणाऱ्या नागरिकांना आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम पर्यटनस्थळ असणार आहे. आजही गडचिरोली जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यात अतिदुर्गम भागात पोहोचण्यास बारमाही नाल्यांवर पुल नसल्याने अडचण होते. एखादा रुग्ण पुल नसल्याने, साधन नसल्याने दगावतो. तर एखादी महिला बाळंत होण्याआधीच आपले बाळ गमावते. 

अशा स्थितीत जिल्ह्यातील पुलांचे महत्त्व समजते. जिल्ह्याच्या विविध भागात अशा पद्धतीने योजनांचा कल्पक वापर करत रस्ते संपर्क आणि सिंचन यांची सांगड घातली जाण्याची गरज आहे.
close