महेश देशमुख (माढा) :
अतिवृष्टीमुळे माढा तालुक्यातील शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरसरकट आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड माढा तालुक्याच्या वतीने प्रांताधिकारी कुर्डूवाडी यांच्याकडे करण्यात आली.
शेती पिकाच्या नुकसानी बाबत विलंब न करता सरसकट मदत जाहीर करावी व त्याची लवकर अंमलबजावणी व्हावी तसेच पंचनामे करताना निष्काळजीपणा करणारे अधिकारी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी यावेळी प्रांताधिकारी कुर्डूवाडी यांच्याकडे करण्यात आली. याप्रसंगी राज्य प्रवक्ते व्याख्याते हर्षल बागल, जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल गवळी, माढा तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, कार्याध्यक्ष कैलास कणसे उपस्थित होते.
शेतकरी संकटात असताना नापिकी, कर्जबाजारीपणा आणि कोरोनाच्या महामारीमुळे आर्थिकदृष्टया शेतकरी कोलमडला गेला असल्याचे चित्र आहे. त्यामध्येच आता शेतकर्यांवर अतिवृष्टीची अवकृपा झाली आहे. या संकटामधून शेतकर्यांना वाचवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मदत केली पाहिजे असे तालुकाध्यक्ष संतोष शिंदे यांनी सांगितले.

