हिंगोली । प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२९,हिंगोली लोकसभा मतदार संघातील किनवट आणि नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद,देगलूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते परंतु त्याची खरेदी शासन स्तरावरून होत नसल्याने याठिकाणी धान खरेदी केंद्र सुरु करावे याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मागणी केली होती.या मागणीची राज्यमंत्र्यांनी दखल घेऊन अखेर धर्माबाद,देगलूर येथे शासन स्तरावरून धान खरेदी केंद्राला सुरवात करण्यात आली आहे . यापूर्वी मका व ज्वारी खरेदी केंद्राबाबत खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा करून केंद्र सुरु केले होते. सोबतच धान खरेदीचे केंद्र किनवट येथे सुरू करण्यात आले होते हे विशेष.
केवळ शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून खासदार हेमंत पाटील यांनी मतदार संघातील शेतकऱ्याबरोबरच नांदेड जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन धान खरेदी केंद्राची मागणी केली आहे.
किनवट , देगलूर आणि धर्माबाद तालुके धान (भात ) उत्पादनात अव्वल आहेत.तालुक्याच्या सीमा तेलंगणा राज्याला लागून असल्याने त्या भागातील शेतकऱ्यांचा धान शेतीवर जास्त जोर आहे.परंतु उत्पादन केलेले पीक शासन स्तरावरून खरेदी केले जात नाही.खाजगी व्यापारी मनमानी भाव देऊन शेतकऱ्याकडून खरेदी करत असतात यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.
यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळून त्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा याकरिता खासदार हेमंत पाटील यांनी धान खरेदी केंद्र सुरू करावे मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडे पत्रव्यवहार आणि झालेल्या बैठकी दरम्यान मागणी केली होती.यानुसार पहिल्या टप्यात मतदार संघातील किनवट येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते.त्यांनतर मतदारसंघाबाहेरील देगलूर आणि धर्माबाद तालुक्यात धान खरेदी केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
असे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पत्राद्वारे कळविण्यात आले असून या ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या अभिकर्ता संस्थांना निर्देश देण्यात आले आहेत.

